Pune News : अनेक क्षेत्रात तृतीयपंथीयांना (transgender) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे. त्यांना योग्य न्याय मिळावा आणि त्यांना आदर मिळावा यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरु आहे. यासाठी आता निवडणूक आयोगाने देखील पुढाकार घेत ला आहे. निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल, असं मत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. 


मतदार यादी पुनपरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे त्यांनी तृतीयपंथी घटकांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सदस्या दिलशाद मुजावर आदी उपस्थित होते. 


तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी प्रकिया अतिशय सोपी केली असून तंत्रज्ञान, जन्म दाखला आदी समस्यांवर मार्ग काढला जाईल. प्रत्येक राज्यात तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधत आहोत. निवडणूक प्रकियेच्या अनुषंगाने तृतीयपंथींयासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल, असं कुमार यांनी सांगितलं. 


तृतीयपंथींयांमधून निवडणूक आयकॉन नेमण्याचा विचार
तृतीयपंथीयांची संख्या  सुमारे 5 लाख  आहे. तरीही केवळ 10 टक्के मतदार नोंदणी झाली आहे. त्यांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या राज्यघटनेने जात, धर्म, लिंग आदी कशाही आधारे भेदभाव होणार नाही याची हमी दिली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमात देखील ही तरतूद असल्यामुळे तृतीयपंथीयांनाही मतदार नोंदणी, निवडणुकीत भाग घेण्यास कोणतीही समस्या येणार नाही, त्याबाबत आयोग अधिक प्रयत्न करेल. राष्ट्रीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तृतीयपंथींयांमधून निवडणूक आयकॉन नेमण्याबाबत निवडणूक आयोग निश्चित विचार करेल, असेही ते म्हणाले. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. तृतीयपंथीयांनी आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानासाठी नाव नोंदणी करावी आणि आपला मतदान करावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करुन घेतलं आहे. सामन्य आणि त्यांच्यात कोणतीही रेघ राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे.