Pune MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) कोकण दौऱ्यावर असताना पुण्यात (Pune) मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे पुणे (Mns) माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदावरुन नीलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासह 400 पदाधिकारी आणि सदस्यांनी मनसेला राम राम ठोकला आहे. या सगळ्यांच्या राजीनाम्यामुळे पुण्यात मनसे खिळखिळी होण्याची शक्यता आहे. 


मागील काही दिवसांपासून पुण्यातील मनसेच्या नेत्यांमध्ये असलेले अनेक अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. अनेकांनी त्यांचं मत उघडपणे स्पष्ट केलं नसलं तरीही कार्यकर्त्यांमध्ये खदखद बघायला मिळत आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने नीलेश माझिरे यांची कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबतच त्यांच्या तब्बल 400 सदस्यांनीदेखील मनसेचा राजीनामा दिला आहे. 


वसंत मोरेंचे समर्थक असल्याने हकालपट्टी?
नीलेश माझिरे हे पुण्यातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्या दोघांनी पुण्यात मनसेचं मागील अनेक वर्ष काम केलं. पक्षबांधणीत या दोघांचाही मोठा वाटा आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षनोंदणीला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी मावळ आणि पुण्यातील इतर ग्रामीण भागातील सदस्यांची नोंदणी करुन घेण्यात दोघांचाही महत्वाचा वाटा होता. मात्र वसंत मोरे आणि राज ठाकरे यांच्यात काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरु असल्याचं चित्र आहे. शिवाय वसंत मोरेही पक्षाच्या काही निर्णयावर नाराज असल्याच्या चर्चा आहे. वसंत मोरेंचा खंदेसमर्थक असलेल्या नीलेश माझिरेंची राज ठाकरेंनी हकालपट्टी केली आहे, अशा चर्चा आहेत. 
 
अनेक सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत?
नीलेश माझिरे यांचा ग्रामीण परिसरात मोठा जनसंपर्क असल्याने ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी सदस्याची नोंदणी केली होती. त्यातील तरुणांची संख्या मोठी होती. मात्र आपल्याच नेत्याची पदावरुन हकालपट्टी केल्याने सदस्यही आक्रमक झाले आहेत. आतापर्यंत 400 सदस्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी नीलेश माझिरे यांची हकालपट्टी झाली होती. त्यानंतर रविवारी एका दिवसात 400 जणांनी राजीनामा दिला मात्र ज्या वेगात ही माहिती अनेक सदस्यांपर्यंत पोहोचेल त्या वेगात राजीनामे दिले जातील, असा विश्वास नीलेश माझिरे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर तरुण सदस्यांनी राजीनामे देणं, मनसेला चांगलंच महागात पडणार असल्याचं बोललं जात आहे.