- एक महिन्याचा अवधी
- एका महिन्यात कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्लॅन बनवणार
- ग्रामस्थांच्या मागण्यांविषयी चर्चा करु
- पुण्यातला कचरा विकेंद्रीत पद्धतीनं कसा जिरवता येईल याचा प्लॅन बनवणार
- नवीन तंत्रज्ञानातून कचऱ्यावर प्रक्रिया करणार
- यासाठी बृहत प्लॅन आखणार
- फुरसुंगीतून जमिनीच्या कॅपिंगचाही विचार करणार
- एका महिन्यात बाबी मांडणार
- नोकऱ्यांची विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी नोकरी देणार
- नुकसानभरपाई कशी देता येईल याचाही विचार
पुण्याचा कचराप्रश्न : फुरसुंगीकरांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 09 Jun 2017 11:22 AM (IST)
पुणे : नुकत्याच कचराकोंडीनं वैतागलेल्या पुणेकरांची पुन्हा एकदा कचराकोंडी होण्याची शक्यता आहे. कारण उरुळी देवाची आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आज शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचं ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र पालिका आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. वारंवार आंदोलन करणाऱ्या फुरसुंगीवासियांनी कचरा प्रश्नावर आक्रमक होत 14 एप्रिलपासून आंदोलन छेडलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर 7 मे रोजी पुण्याची कचराकोंडी फोडण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं. फुरसुंगीकरांनी तब्बल 23 दिवस पुण्याची कचराकोंडी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक ग्रामस्थांकडे एका महिन्याचा अवधी मागितला होता. या एका महिन्यात मुख्यमंत्र्यांनी महापालिका आणि राज्य सरकार मिळून आराखडा सादर करेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आज एका महिन्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून कोणताही आराखडा सादर न झाल्यानं फुरसुंगीकरांनी पुन्हा आंदोलन छेडलं आहे. आजपासून पुन्हा कचरा आंदोलन करण्याचा निर्णय फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यात पुण्यातील कचरा आंदोलनाची कोंडी फोडताना एक महिन्याच्या आत पुण्यातील कचऱ्याच्या प्रक्रियेचा आराखडा सादर केला जाईल असं सांगितलं होतं. आज त्या आश्वासनाला एक महिना पुर्ण झाला. मात्र उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावातील ग्रामस्थांना आराखडा आणि कचऱ्याचं ओपन डंपिंग कधी बंद होणार याची माहिती न मिळाल्याने आज सकाळी दहा वाजल्यापासून कचऱ्याच्या गाड्या कचरा डेपोमधे येऊ न देण्याचा निर्णय दोन गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी काय दिली आश्वासनं?