पुणे : गणेशोत्सव म्हणजे विघ्नहर्त्याचा सण. मात्र (Pune Ganeshotsav 2023) याच सणाला सुरुवातीपासूनत अनेक संकटांनी घेरलं होतं. गणेशोत्सवादरम्यान दवर्षी भरपूर पाऊस पडतो. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आणि अनेकदा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचंदेखील नुकसान झालं. त्यासोबतच पुर्वीच्या काळाचा विचार केला तर प्लेग सारखा साथीचा रोग, त्यानंतर अनेक युद्ध, नैसर्गिक आपत्ती ते दोन वर्षांपूर्वी जगाला झुकायला लावणाऱा कोरोना. या सगळ्या संकटांना तोंड देत गणेशोत्सव अजूनही टिकून आहे. गणपती मंडळाचे कार्यकर्त्यांनी लोकमान्यांची शिकवण अंगीकारुन या सगळ्या संकटांना तोंड दिलं आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा केला. 


गणेशोत्सवाचा गाजावाजा, त्याचा इतिहास, परंपरा आणि मिरवणुका याचा आढावा घेत असताना या संकटांचा आढावा घेणंदेखील आवश्यक आहे. कारण याच संकटांंनी अनेकांना निर्भिड बनवलं आहे. गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ सांगतात, की स्वातंत्र्य पूर्व काळाता ब्रिटीश हे सगळ्यात मोठं विघ्न होतं. या ब्रिटीशांना हा उत्सव मान्य नव्हता. भारतीय लोक एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र यावी, अशी त्यांची ईच्छा नव्हती. त्याच काळात भारतात प्लेगची साथ आली. याचकाळात प्रशासनाचा अतिरेक करुन जो अत्याचार केला. त्याचाही मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक आपत्ती या गणेशोत्सवाने सोसल्या आहेत. त्यात युद्ध, नैसर्गिक आपत्ती, जातीय दंगली, प्लेग सारख्या रोगाचा यात समावेश आहे. 


1961 सालचा पानशेतचा पूर...


1961 साली पुण्यात पानशेतचं धरण फुटलं होतं आणि पुण्यात पूर आला होता. या पानशेतच्या पुराच्यावेळी पुण्यातील मध्यवर्ती वस्तीत पाणी शिरलं होतं. त्यात उत्सवाच्या मुर्ती आणि अनेकांची घरं पाण्याखाली गेली होती. त्यावेळी अनेक गणपतीचे कार्यकर्ते पुणेकरांच्या मदतीला धावून आले होते. पुणं उद्ध्वस्त झालं असं सगळीकडे बोललं गेलं मात्र याच कार्यकर्त्यांनी मिळून नवं पुणं वसवलं. त्यावेळी पुनश्च हरिओम म्हणत अनेक कार्यकर्ते भिडले आणि परिस्थिती आटोक्यात आणली होती. 


त्यानंतर 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. त्यावेळी भारत बेसावध होतं आणि भारतीय लष्करदेखील परिपूर्ण नव्हतं. याच चीनच्या यु्द्धाच्या काळात भारतात सगळीकडे ब्लॅक आऊट होता. गणेशोत्सव म्हटलं तर हा रोषणाईचा सण आहे. मात्र त्याकाळी संपू्र्ण देशातसह पुण्यात ब्लॅकआऊट करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यांवर सगळीकडे अंधार आणि शुकशुकाट होता. हे सगळे निर्बंध कार्यकर्त्यांनी पाळले मात्र उत्सव थांबू दिला नाही. त्याकाळी केंद्र सरकारसाठी निधी उभा करुन लष्करांना मदतदेखील केली होती. 


1962 सालचं पाकिस्तानबरोबरचं युद्ध


1962 साली पाकिस्तानशी युद्ध झालं होतं. मात्र या युद्धाच्यावेळी चीनच्या युद्धाचा अनुभव होता. त्यामुळे सरकार, प्रशासनाची या युद्धासाठी मोठी तयारी होती. देव, देश आणि धर्माचा विचार करणारे कार्यकर्त्यांनी उत्सावाच्या काळात सुद्धा सर्व बंधनांचा स्वीकार करुन युद्धजन्य परिस्थितीशी पूरक भूमिका घेतली होती. त्यावेळी देशभरातून भारतीय लष्कराला मदत पाठवली जात होती. मोठा निधी उभारला जात होता. त्यासाठी हातभार म्हणून पुण्यातील व्यापाऱ्यांनी मोठा हातभार लावला होता. मंडईतील व्यापाऱ्यांनी आपल्या मालावर तिरंगा लावून त्या दिवसाचं उत्पन्न देशाच्या सेवेसाठी दान केलं होतं. त्यानंतर 1971सालचं बांग्लादेशचं य़ुद्ध, कारगील युद्ध, जातीय दंगलींनाही गणेशोत्सावाने तोंड दिलं आहे. ही सगळी युद्ध झाल्यानंतर स्वाईन फ्लूचा काळात उत्सव हवा, गर्दी नको, अशा घोषणा दिल्या गेल्या. त्या घोषणांना किंवा निर्बंधांना कार्यकर्त्यांनी आणि सामान्य नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. 


कोरोनाचे निर्बंध पाळून गणेशोत्सव...


कोरोनाकाळातही दोन वर्ष गणेशोत्सवावर मोठे निर्बंध होते. सरकारने अनेक नियम जाहीर केले होते. सगळीकडे तणावाची परिस्थिती होती. लोककल्याणासाठी आणि लोक जागृतीसाठी सुरुवात केलेल्या गणेशोत्सवात लोकांवरच निर्बंध घातले गेले होते. दोन वर्ष उत्सव जल्लोषात नाही तर परिस्थितीला सामोरं जात, आहे तशा परिस्थितीत साजरा करण्यात आला. मंडळांनी आरोग्य शिबीरं आयोजित केली. गणेशोत्सवासाठी लागणारा निधी आरोग्यासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी वापरण्यात आला आणि सगळ्यांनी मिळून बाप्पाची साथ घेत कोरोनासारख्या भीषण आजारालादेखील तोंड दिलं आणि गणेशोत्सवाचा उत्साह टिकवून ठेवला. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Ganeshotsav 2023 : विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळं अन् ढोल ताशा पथकांसाठी महत्त्वाची माहिती, यंदा अलका टॉकीज चौकात...