पुणे : कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या महामार्गांवर स्थलांतरितांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था करण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकारी कार्यालातून देण्यात आले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातील तसेच पुण्यातील मजुरांचे राष्ट्रीय महामार्गांवरुन मोठ्या प्रमाणावर स्थालांतर होत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असून पायी किंवा इतर मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी विश्रामगृह, नाष्टा, जेवण आणि शौचालयाची सुविधा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे-बंगळुरु, पुणे-सोलापूर, पुणे-अहमदनगर ,पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक या महामार्गांवर या सुविधा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या मार्गावरील तहसिलदारांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने मजूरांची व्यवस्था करायची आहे. तसेच महामार्गावर आवश्यकतेप्रमाणे  मंगल कार्यालय, ढाबा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी मजूरांची सोय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विश्रांती ग्रहात चहा, नाश्ता, भोजन आणि स्वच्छतागृह व्यवस्था करावी. तसेच मजुरांना हात धुण्याची सोय, सॅनीटायझर उपलब्ध करून द्यावं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं कडक पालन होईल याची दक्षता घ्यावी असे आदेश दिले आहेत. तसेच विश्रामगृहाच्या ठिकाणी गरजेनुसार पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यास संगितलं आहे.

लॉकडाऊन केल्यानंतर सद्यस्थितीला फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स बंद असल्याने वाटेत उपाशीपोटी मजुरांना प्रवास करावा लागत आहे. पोटामध्ये अन्न नाही, प्यायला पाणी नाही, डोक्यावर ऊन अशा परिस्थितीत घर गाठायचे कसे? हा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. अशा परिस्थितीत पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाने स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या बऱ्याच अडचणी दूर होणार आहे.

दरम्यान राज्याने कोरोना बाधित रुग्णांचा 20 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. काल 1165 नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी हजाराच्या घरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही 20 हजार 228 इतकी झाली आहे. तर, एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद काल झाली. काल तब्बल 48 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे काल 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात 3800 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली होती.