मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईप्रकरणी आज राष्ट्रवादी नेते आणि आमदार अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा असू शकतो?, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार वितरण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे फक्त कुलगुरुंचं अपयश नसून शिक्षण मंत्रीही त्याला पूर्ण जबाबदार असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा होण्याऐवजी आज साजरा होत असल्याबद्दल त्यांनी तावडेंवर टीका केली. सरकारला शिक्षण आणि शिक्षकांबद्दल फारसं गांभीर्य नाही, असंही ते म्हणाले.