पुणे : येत्या 26 ऑक्टोंबर पासून पुणे एअरपोर्टवर पुढील एक वर्ष विमानं सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या कालावधीतच ये जा करू शकतील. एवढंच नव्हे तर पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पुणे एअरपोर्ट संपूर्णपणे बंद ठेवण्याची वेळही येऊ शकते असं पुणे एयरपोर्ट कार्यालयाचे निर्देशक कुलदीपसिंग यांनी म्हटलंय.


पुणे एअरपोर्ट हा भारतीय वायुदलाच्या जागेमध्येच उभारण्यात आला असून वायूदलाला हवाई पट्टीच्या दुरुस्तीचे आणि विस्तारीकरणाचे काम सुरु करायचे आहे. हे काम करण्यासाठी एअरपोर्ट रात्रीच्या वेळी बंद ठेवावा लागणार आहे. पुणे एअरपोर्टला स्वतःची जागा नाही. भारतीय वायुदलाच्या लोहगाव येथील हवाई तळाच्या जागेमध्येच पुणे एयरपोर्ट उभे आहे. हवाई तळाचा एक भाग वायुदलाकडून वापरला जातो तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे असलेल्या दुसऱ्या भागात प्रवासी विमानांची ये जा होत असते. मात्र वायूदलाला त्यांच्या ताब्यात असलेल्या भागात हवाईपट्टीचे विस्तारीकरण आणि दुरुस्ती करायची असल्याने सर्वच विमानांच्या टेक ऑफ आणि लॅंडिगवर मर्यादा येणार आहेत .


गेली अनेक वर्ष पुणे एअरपोर्ट नवीन जागेत सुरु करण्याची चर्चा सुरु आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या शकडो एकर जमिनीच्या अधिग्रहणात अनेक अडचणी येत असल्यानं नवीन एअरपोर्ट उभे राहू शकले नाही . मात्र आता त्याचा परिणाम विमान प्रवासावर होणार आहे. पुण्याच्या शेजारी विमानतळ उभारण्यासाठी आधी चाकणची निवड करण्यात आली होती . परंतु तो प्रकल्प बारगळला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ उभारण्याची घोषणा करण्यात आली. परंतु त्याठिकाणी देखील नागरिकांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध केल्यानं एअरपोर्टसाठी आवश्यक असलेली जमीन अजूनही अधिग्रहित होऊ शकलेली नाही .


1939 साली दुसरं महायुद्ध सुरु झाल्यानंतर इंग्रजानी पुण्याजवळील लोहगांव इथं लढाऊ विमानांसाठी हवाई पट्टी तयार केली होती. मुंबईला शत्रूच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी त्यावेळच्या रॉयल एअरफोर्सकडून लोहगावला एअरस्ट्रीप तयार करण्यात आली होती . स्वातंत्र्यानंतर भारतीय वायुदलाने या ठिकाणी लढाऊ विमानांसाठी हवाईतळ उभारला. मिग , सुखोई यासारख्या विमानाचं प्रशिक्षण देण्यासाठी हवाईदलाकडून लोहगाव हवाई तळाचा उपयोग केला जातो. वायुदलाला अनेक वर्षांपासून या तळावर दुरुस्ती करायची आहे पण प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या नागरी विमानाचं काय करायचं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. मात्र आता वायुदलाला हवाईपट्टीच काम करणं गरजेचं बनल्यानं एअरपोर्टवरून ये जा करणाऱ्या विमानांवर निर्बंध घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या निर्बंधांमुळे पुणे एअरपोर्टवर कोणताही परिणाम होणार नाही. विमानांना दिवसाची वेळ टेक ऑफ आणि लॅन्डिंगसाठी उपलब्ध करून दिली जाईल असा दावा पुणे एअरपोर्ट कार्यालयाचे निर्देशक कुलदीपसिंग यांनी केलाय .


मात्र विमानांच्या वेळेवर मर्यादा आल्यास साहजिक त्याचा परिणाम प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे . विमान प्रवासासाठी पुण्यातील लोकांना मुंबई एअरपोर्टच्या उपयोग करावा लागू शकतो . त्याचबरोबर एप्रिल आणि मे महिन्यात पुणे एअरपोर्ट संपूर्णपणे बंद ठेवावा लागल्यास पुणेकरांना मुंबई एअरपोर्टवर पोहचून विमानप्रवास करावा लागेल . या प्रकरणातून धडा घेऊन आता तरी पुण्याच्या नव्या एअरपोर्टच्या उभारणीला वेग येईल अशी अपेक्षा आहे.