पुणे: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे हा पुतळा कोसळलेला असतानाच दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधून कोट्यवधी रुपये खर्च करून पिंपरी चिंचवडमध्ये उभारला जात असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला (Chhatrapati Sambhaji Maharaj statue) उभारणी आधीच तडे गेले आहेत, त्यामुळे पुतळा उभारणीचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय का? असा सवाल उपस्थित झाला होता. याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं उलट-सुलट चर्चा रंगलेल्या आहेत.


पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल 100 फुटी पुतळा उभारला जात आहे. मात्र पुतळा उभारण्यापूर्वी महाराजांच्या पायाला तडा गेला. तसा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं उलट-सुलट चर्चा रंगलेल्या आहेत. महापालिका या पुतळ्यासाठी एकूण 47 कोटींचा खर्च करणार आहे. दिल्लीमध्ये या पुतळा साकारून याचे पार्ट पिंपरीत आणले जात आहेत. हा पुतळा प्रत्यक्षात उभारायला 2025 उजाडेल असं पालिलेकडून सांगण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वीच पायाला तडा गेल्यानं हे काम निकृष्ट दर्जाचे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र याबाबत आत्ताच असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल, असं पालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. 


पिंपरी चिंचवडमध्ये शंभू सृष्टी उभारली जााणार आहे. या शंभू सृष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj statue)  100 फूट उंच पुतळा कास्य धातूमध्ये उभा केला जाणार आहे. मात्र, हा पुतळा ज्या पायावर उभारला जाणार आहे तो पायांनाच तडे गेले आहेत. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. 


सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला


कोकणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा इतक्या निकृष्ट दर्जाचा कसा उभारला जाऊ शकतो, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. 


या निवेदनात भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले आहे की, 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी सिंधुदुर्गवासियांना अर्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सोमवारी दुर्दैवीरित्या जे नुकसान झाले त्याविषयी आम्हाला अतीव दु:ख आहे. राज्य सरकार, संबंधित तज्ज्ञमंडळी आणि नौदलातील अधिकाऱ्यांचे पथक तातडीने या दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी काम सुरु करेल. ही दुर्दैवी दुर्घटना होती. छत्रपती शिवरायांचा पुतळ्याची दुरुस्ती करुन तो पुन्हा राजकोट किल्ल्यावर लवकरात लवकर बसवला जाईल, असे भारतीय नौदलातर्फे सांगण्यात आले.