Girls Missing : महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 तरुणी राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. राज्य सरकारच्या वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे, असं म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यातूनच एकट्या पुणे जिल्ह्यातून तब्बल 447 महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


पुणे जिल्ह्यातून गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांत पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील 447 महिला बेपत्ता झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही धक्कादायक माहिती उघड केली होती. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण 5,610 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची माहिती चाकणकर यांनी दिली होती. या सर्व महिला आणि मुली 16 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत, असं त्यांनी सांगितलं होतं. 


अहवाल सादर करण्याचे राज्य महिला आयोगाचे गृह विभागाला आदेश


या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत पुणे शहरातील 148, पिंपरी चिंचवडमधील 143 आणि पुणे ग्रामीणमधून 156 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून समोर आहे. 82 महिला आणि मुली कुटुंबांनी नोकरी किंवा इतर कारणांसाठी परदेशात पाठवल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क तुटल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी अशा महिला आणि मुलींची ओमान आणि दुबईत तस्करी होण्याची भीती आहे आणि हे प्रकरण राज्य महिला आयोगाने पत्राद्वारे परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवले आहे, असे त्या म्हणाल्या. गेल्या तीन वर्षांत देशात सर्वाधिक महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची नोंद महाराष्ट्रात झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करुन दर 15 दिवसांनी राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.


बेपत्ता तरुणींची जिल्हानिहाय आकडेवारी


अहमदनगर 184, अकोला 41, अमरावती शहर 31, अमरावती ग्रामीण 63, औरंगाबाद शहर 66, औरंगाबाद ग्रामीण 52, बीड 27, भंडार 23, मुंबई शहर 383, बुलढाणा 76, चंद्रपूर 101, धुळे 45, गडचिरोली 13, गोंदिया 46, हिंगोली 14, जळगाव 121, जालना 36, कोल्हापूर 127, लातूर 42, मीरा-भाईंदर 113, नागपूर शहर 108, नागपूर ग्रामीण 169, नांदेड 36, नंदुरबार 37, नाशिक शहर 93, नाशिक ग्रामीण 169, नवी मुंबई 75, उस्मानाबाद 34, पालघर 28, परभणी 27, पिंपरी चिंचवड 143, पुणे शहर 148 आणि पुणे ग्रामीण 156 अशी बेपत्ता तरुणींची संख्या आहे. या सर्व बेपत्ता तरुणी 16 ते 25 वयोगटातील आहेत.