Pune Crime:  पुण्यात काही नराधमांनी फिल्मी पद्धतीने गुन्हेगारीची घटना घडवून आणली आहे. मात्र पुणे पोलिसांकडून याच हल्लेखोरांवर कडक कारवाई केली आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गोदामातून दारू चोरी केल्या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 9 लाख रुपये किंमतीच्या 110 दारूच्या पेट्या जप्त केल्या आहेत. 



या प्रकरणात विभीषण काळे या आणखी एका आरोपीची ओळख पटली असून तो अद्याप फरार आहे. फरार आरोपी विभीषण काळे याच्यावर पोलिसांत यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींनी उसाच्या शेतात दारूच्या पेट्या लपवून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपींनी दारूच्या गोदामाची भिंत तोडून मार्ग काढला होता. यानंतर आरोपी 12.65 लाख रुपयांची दारू घेऊन फरार झाले होते.


आरोपींनी ज्या गोदामात दारू चोरली होती ते गोदाम बाहेरील बाजूस होते आणि त्यामागील जागा पूर्णपणे रिकामी होती. कोणत्याही प्रकारचे घर किंवा इमारती नव्हत्या. याचा फायदा घेत आरोपींनी मागून भिंत तोडून गोदामात प्रवेश केला आणि 120 पेट्या घेऊन पळ काढला. गोदाम मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुणे पोलिसांकडून कारवाईचा धडाका


गणपती उत्सवापुर्वी पुणे पोलिसांनी शहरात करडी नजर ठेवायचा सुरुवात केली आहे. मोठा बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी पुणे गुन्हे शाखेने बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या चोरट्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच पिस्तूल आणि 11 काडतुसे जप्त केले होते. या प्रकरणी दोन आरोपींना अवैध पिस्तुल आणि 11 काडतुसांसह अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश प्रकाश जाधव (23) आणि मुजम्मील हारून बागवान यांचा समावेश होता. आकाश कात्रजमधील भिलारेवाडी येथील रहिवासी आहे तर मुजम्मिल अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील रहिवासी होते.


गणेशोत्सवानिमित्त पोलिसांचा विशेष बंदोबस्त
पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मात्र या 10 दिवसात अनेक प्रकारचे गुन्हे समोर येतात. यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात होणार असल्याने नागरीकांची गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात असेल. त्यासाठी पोलिसांनी मागील काही दिवसांपासूनच शहरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. यात नागरीकांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यासोबतच शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हे रोखण्याला मदत होणार आहे.