Indapur Well Accident : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात विहिरीचं रिंग मारण्याचं काम सुरू असताना अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील चार कामगार ढिगार्‍याखाली अडकले गेले आहेत. ही घटना काल संध्याकाळच्या दरम्यान घडली. मात्र याचा उलगडा रात्री उशिरा झाला आहे.


माती विहिरीत पडल्यानं ढिगाऱ्याखाली 4 जण अडकले


सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण वय आणि मनोज मारुती चव्हाण हे चार कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंग मारण्याचं काम करीत होते. अचानक त्यांच्यावरती हा मलबा आणि विहिरीचा स्लॅब कोसळला आणि त्या ढिगार्‍याखाली ही कालपासून अडकले आहेत. ज्यावेळी ही चारही लोक नेहमीप्रमाणे आपल्या घरी सायंकाळी परतले नाही. तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि हा शोध शेवटी त्या विहिरीजवळ येऊन थांबला. त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या. मात्र ते चार लोक आणि त्यांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्‍याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. 


विहिरीचं काम करताना दुर्घटना


काही जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने हा ढिगारा आता बाजूला करण्याचं काम सुरू आहे. आमदार दत्तात्रय भरणे तहसीलदार श्रीकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना या संदर्भात कळविण्यात आले असून एनडीआरएफ पथक आता या ठिकाणी दाखल झालं आहे आणि विहिरीतून माती काढण्याचं काम सुरू आहे.


इंदापूर विहिरीचे काम बेकायदेशीर, नागरिकांचा आरोप


इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून चार जण मातीखाली गाठले असल्याने प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम आहे. दुर्घटनेत अडकलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी या घटनेतील चार जण हे बेलवाडी गावचे नागरिक असून, सदरील विहिरीचे कामे बेकायदेशीर असून या मालकाने चार कुटुंबांचा जीव धोक्यात घातला, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेलवाडीच्या महिला सरपंच मयुरी जामदार आणि नागरिकांनी केली आहे


विहिर मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी


या विहिरीचे काम बेकायदेशीर असल्याची तक्रार काही नागरिकांनी इंदापूर तहसीलदार यांना दिली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या घटनेतील दोषीवर कायदेशीर कारवाई करून घटनेतील लोकांच्या नातेवाईकांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष शरद जामदार यांनी केली.