पुणे : टेमघर धरणाच्या सुरक्षेसंदर्भात कायदे विभागाला चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'माझा'ला दिली आहे. काल टेमघर धरणाची पाहणी केल्यानंतर धरणाला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य महाजन यांनी केलं होतं.


 

 

त्यांच्या वक्तव्यावर टीका होताच धरणाच्या सुरक्षेसंदर्भात कोणताही यू-टर्न घेतला नसल्याचं महाजन यांनी म्हटलं. शिवाय लवकर दोषींवर कारवाई करु असं आश्वासनही महाजन यांनी दिलं आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातल्या ओढे नाले, उपनद्यांच्या सर्वेक्षणाचेही आदेशही गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

 
टेमघर धरणाच्या भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असली तरी धरणाला मोठा धोका नाही, असा अजब तर्क जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लावला होता. धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या पाणीगळतीची बातमी ‘एबीपी माझा’नं दाखवल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर धरणाची पाहणी केली होती.

 
पाहणी केल्यानंतर या धरणाला फार मोठा धोका नसल्याचं प्रमाणपत्रं महाजन यांनी देऊन टाकलं. त्यामुळे जलसंपदामंत्री महाजन कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला होता. धरणाच्या गळतीमुळे निर्माण झालेले प्रवाह पाहिल्यानंतर टेमघरला तडे तर गेले नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.

 

 

गिरीश महाजन यांच्या माहितीनंतर टेमघरच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करु नका असा सल्ला जलतज्ज्ञ विजय पांढरे यांनी दिला होता. त्यामुळे महाजन यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


संबंधित बातम्या :


 

टेमघरच्या पाणीगळतीने धरणाला धोका नाही : गिरीश महाजन