Girish Bapat death :  पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 3 सप्टेंबर 1950  त्यांचा पुण्यातील तळेगावस दाभाडे गावात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातू आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांसोबतच भाजपच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्याची ताकद अशी त्यांची ओळख होती. पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यात आणि रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गिरीश बापट यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी असेल. सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील.


सर्वमावेशक नेता म्हणून त्यांची ओळख


सर्वमावेशक नेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्ष राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपला उभं करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी प्रत्येकाला सारखी वागणूक दिली होती. पुणे जिल्ह्यातील राजकारणात त्यांची भाऊ म्हणून ओळख होती. राजकारणात सर्वसमावेशक नेता अशी त्यांची ओळख त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. भाजपच्या नेत्यासोबतच विरोधीपक्षाचे नेतेदेखील त्यांचा आदर करत होते. पुण्यातील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांशीही त्यांनी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे अनेक राजकारणी किंवा कार्यकर्ते त्यांचा भाऊ म्हणून उल्लेख करत. पुणे शहरात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. भाजपच्या जुन्या फळीतील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून बापट ओळखले जातात. पुण्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापट यांचे महत्त्वाचे योगदान आहे. गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध होते.


बापटांची राजकीय कारकीर्द...



टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही.1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते.  राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळकांनादेखील राजकारणात आणलं होतं. त्यांच्यासोबतच अनेक भाजप नेत्यांसाठी ते आदर्श होते.