पिंपरी : मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या मावळमध्ये घडली आहे. ज्ञानोबा लागमन असं 50 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी कोंडीवडे गावातील शेतात ही घटना घडली.


ज्ञानोबा हे शेतात काम करत असताना, आगी मोहोळच्या मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. काही कळण्याच्या आत मधमाश्यांनी त्यांच्या शरीरावर सर्वत्र चावा घेतला. ज्ञानोबा यांनी आरडाओरडा केल्याने शेजारच्या शेतात काम करत असलेल्या त्यांच्या दोन्ही भावांनी त्यांच्याकडे धाव घेतली.

ज्ञानोबा यांच्या भावांची त्यांच्या अंगावरील माशा हुसकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र खुप प्रयत्न केल्यानंतर ज्ञानोबा यांनी जवळच्या पाण्याच्या डबक्यात उडी मारली. काही वेळात माशा उडून गेल्या. त्यानंतर ज्ञानोबा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.