Eknath Shinde In Purandar: आम्ही जर बंडखोर आणि गद्दार असतो तर महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं नसतं. एवढ्या मोठ्या संख्येने सभेला लोक आले नसते. याचा अर्थ आमची भूमिका या जनतेने स्वीकारली आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे फाईलींमध्ये काम करणारा नाही. सरकार बदललं आहे. बाळासाहेबांचं आणि प्रमाेद महाजनांंचं सरकार आलं आहे, त्यामुळे नक्कीच योग्य काम होईल, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे बोलत होते.


आपण सगळ्यांनी मतदान शिवसेना भाजपला मतदान केलं. या दोघांच्या युतीचं सरकार येणार या भावनेनं आपण निवडणूका लढवल्या. त्यानंतर जनतेनीही तोच कौल दिला. शिवसेनेचे 56 आणि भाजपचे 105 आमदार निवडून आले. बहूमत जनतेनं दिलं होतं. शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन होईल असं वाटतं होतं. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि समोरचं चित्र आपण सगळ्यांनी बघितलंच, असंही ते म्हणाले.


आतापर्यंतच्या इतिहासात लोक विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे जात असतात. आम्ही सत्तेत होतो. आमच्या सारखे मंत्री सत्ता सोडून पाय उतार झाले. मात्र मी सांगतो मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची आवश्यकता लागत नाही एवढं काम मी मतदार संघात केलं आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 40 आमदार त्यांच्या मतदार संघातली कहाणी मला सांगत होते. मला बंड काहीच आवश्यकता नव्हती या सगळ्यांच्या समस्या ऐकून मी हा बंड केला. हे केलं नसतं तर येत्या निवडणुकांमध्ये हातावर मोडण्याइतकेच आमदार निवडून आले असते, अशी परिस्थिती निर्माण झाली असती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


माविआ  सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांना मोठे निधी उपलब्ध झाले. त्यांनी कामाला सुरुवात केली. भुमिपुजनं केली. मात्र आमच्या नेत्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. आम्ही तक्रारी केल्या मात्र त्याचं काहीच झालं नाही. गेल्या २ वर्षात शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं.  शिवसैनिकांना खोट्या चौकशींना सामोरं जावं लागलं. शिवसैनिक जेलमध्ये जावं लागलं. त्यावेळी शिवसैनिकांना राष्ट्रवादीचे लोक बोलवून चौकशी गृहमंत्र्यांकडे लावू अशी लालसा दाखवण्यात आली, असेही आरोप त्यांनी केले आहे.


अन्याया विरुद्ध पेटून उठा, अशी बाळासाहेबांची शिकवण होती. त्याविरुद्ध आम्ही लढलो आणि जिंकलो.  सर्वांनी आमच्या ऐतिहासिक बंडाची नोंद घेतली. थोडं जरी काही झालं असतं तर आमचा कार्यक्रम झाला असता. एकनाथ शिंदे आणि 50 लोकांनी राजकीय आत्महत्या केली असं अनेकांना वाटत होतं. मात्र अशा परिस्थितीत आमचा प्रवास सुरु झाला अनेक उपमा आम्हाला दिल्या. मात्र विजय केसरकर यांच्या सारखा संत माणूस भेटला. त्यामुळे आमचा भार हलका झाला, असंही ते म्हणाले.