Eknath Shinde Pune Speech: राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्याच चुकीने अंगावर नसते संकट ओढावून घेतले आहे. आज पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अमित शाह यांच्या कौतुकाचे पाल्हाळ लावले होते. अमित शाह यांचे कौतूक करताना एकनाथ शिंदे हे अनेक विशेषणं आणि उपमांचा वापर करत होते. मात्र, या सगळ्याचा कहर झाला तो भाषणाच्या शेवटी. एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी, 'जय हिंद, जय महाराष्ट्र', असे म्हटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना काहीतरी आठवले आणि त्यांनी पुन्हा माईकपाशी येऊन 'जय गुजरात', असे म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या या गुजरातच्या उल्लेखावरुन प्रचंड मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या भाषणादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी "जय हिंद, जय महाराष्ट्र,जय गुजरात" असा नारा दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आश्चर्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्रात होणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय गुजरात’ ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत दिली गेल्याने यापुढे राजकीय चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोषणेमागे कोणते राजकीय संकेत आहेत का, यावर अद्याप शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या एका घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय तयार झालेला आहे.
या कार्यक्रमात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भाषणे झाली. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांनी आपल्या भाषणात थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची महती कथन केली. अमित शाह या कार्यक्रमाचे आकर्षण केंद्र असले तरी हा कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे हेच चर्चेचा विषय ठरले. एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी 'जय गुजरात' का म्हटले, हा एकच प्रश्न सर्वतोमुखी होता. एरवी एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणाचा शेवट असा करत नाहीत. मग नेमके आजच एकनाथ शिंदे यांना 'जय गुजरात' बोलण्याची बुद्धी कशी सुचली, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
सुषमा अंधारेंचा संताप
एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर सुषमा अंधारे संतापून म्हणाल्या की, मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे ते बक्षीस मिळाल्याने आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीने अजित पवारांनी सर्व ताब्यात घेतलेले आहे आणि एका अर्थाने शिंदे हे बऱ्यापैकी वेगळे झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाहात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणे गरजेचे आहे. या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होते की, जिथे राज्याचा मुख्यमंत्रीपद भूषवलेली व्यक्ती जय गुजरात म्हणते, तिथे सुशील केडिया सारख्या व्यक्तींनी मी मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करून घ्या? हा उन्नतपणा त्यांच्या ठायी येणे फार स्वाभाविक आहे. जे या प्रदेशाच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी आपण कसा वर्तन व्यवहार ठेवायचं, हे इथल्या मराठी जनतेला ठरवावे लागेल. भाजपने ज्या पद्धतीने नो हिंदी नो बिझनेस, असा ट्रेंड चालवला. आता इथल्या मराठी माणसाने नो मराठी नो कॉपोरेशन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो वोटिंग, हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागणार आहे आणि आता तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागणार आहे.
निश्चितपणाने हा राजकीय डावपेजांचा भाग आहे. जेव्हा मराठी माणूस एकवटत आहे. उद्या मराठी माणसाची एकजूट वरळीत दिसणार आहे. अगदी त्याच वेळेला गैरमराठी मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न तितक्याच जोरदार पद्धतीने भाजप करणार आहे. भाजपाच्या गैरमराठी मतांच्या एकत्रीकरणामध्ये मी कसा तुमचा सगळ्यात मोठा मदतगार आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणून जाणीवपूर्ण जय गुजरात म्हणणे. कारण शिंदे ज्या ठाणे जिल्ह्यातून येतात, त्यात मीरा-भाईंदरची महापालिका आहे. तिथे बऱ्यापैकी अमराठी लोकांचा पट्टा आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक तोंडावर असताना तिथल्या मतांना डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे वक्तव्य करणे असू शकते. तिकडच्या सगळ्या गुजराती मतदारांना याचा विचार करावा लागेल, जो माणूस ज्या मातीत जन्मला, ज्या मातीतून मोठा झाला, जो माणूस त्या मातीशी बेईमानी करू शकतो तो गुजराती लोकांशी काय इमानदार राहणार? उद्या संधी मिळाली तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर पाय ठेवून उभे राहायला कमी करणार नाहीत.
केम छो एकनाथ शिंदे साहेब
एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर राज्यातील विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता शिंदे साहेबांसोबत कसं बोलायचं? केम छो एकनाथ शिंदे साहेब, असं म्गृहणत डिवचलं आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. या सगळ्यातून एकच म्हणावं वाटतं विनाशकाले विपरीत बुद्धी असंही पुढे ते म्हणालेत.