पुणे : राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लातुरातील वादग्रस्त वक्तव्य मागे घेत असल्याचा खुलासा केला आहे. तसेच कोणाच्याही भावना दुखवायचा आपला उद्देश नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.


दिलीप कांबळे यांनी लातूरमध्ये काल (रविवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ब्राम्हण समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कांबळे यांनी आंदोलनं होऊ द्या, आंदोलनाला घाबरायला मी काय ब्राह्मण आहे? असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अखिल भारतीय समाजाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर दिलीप कांबळे यांनी तत्काळ आपण हे वादग्रस्त वक्तव्य मागे घेतल असल्याचं स्पष्ट केलं.

दिलीप कांबळे म्हणाले की, “सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केल्याने सरकारच्या बदनामीसाठी आंदोलन केली जात आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या. हिंमत असेल तर माझ्यासमोर घोषणा द्यायच्या होत्या. मी मुस्काटात लावल्या असत्या. मी दलित आहे. मी काय ब्राह्मण आहे का? हे सरकार सर्वप्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे. म्हणून काही लोकांची पोटं दुखायला लागली आहेत.”

दिलीप कांबळे यांच्या विधानानंतर कार्यक्रमात उपस्थित असलेले लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “आज होळी आहे. त्यामुळे मंत्री जे काही बोलले ते कोणी मनावर घेऊ नये,” असं निलंगेकर म्हणाले होते.

दरम्यान, आपली चूक लक्षात आल्यानंतर दिलीप कांबळे यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना, काळजी घेण्याची गरज असल्याचंही मत ही नोंदवलं आहे.

व्हिडिओ पाहा


संबंधित बातम्या

घाबरायला मी काय ब्राह्मण आहे? : दिलीप कांबळे