धनंजय देसाईची आज येरवडा कारागृहातून सुटका
एबीपी माझा वेब टीम | 09 Feb 2019 12:53 PM (IST)
सोशल नेटवर्किंग साईटवरील काही आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात 2014 साली तणाव निर्माण झाला होता. त्याच वातावरणात 2 जून 2014 साली आयटी क्षेत्रातील मोहसीनची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह 23 कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल केले होते.
पुणे : पुण्यातील आयटी अभियंता मोहसीन शेख हत्याप्रकरणातील संशयीत आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईची आज दुपारी येरवडा कारागृहातून सुटका होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 17 जानेवारी रोजी धनंजय देसाईला जामीन दिला होता. सोशल नेटवर्किंग साईटवरील काही आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात 2014 साली तणाव निर्माण झाला होता. त्याच वातावरणात 2 जून 2014 साली आयटी क्षेत्रातील मोहसीनची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह 23 कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळावा यासाठी देसाईने मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अभिजीत देसाई यांच्यामार्फत जामीन अर्ज केला होता. मोहसीन शेख हा तरुण आयटी अभियंता होता. मूळचा तो सोलापूरचा होता. तो पुण्यात कामासाठी स्थायिक झाला होता. मात्र त्याची विनाकारण हत्या करण्यात आल्यानं त्यांच्या कुटुंबीयांचीही स्वप्न त्याच्याबरोबरच संपली. न्याय मिळावा यासाठी त्याचे कुटुंबीय आणि मित्र सामाजिक कार्यकर्त्यांसह गेली साडेचार वर्ष संघर्ष करत आहेत. अशात मोहसीनच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी याची सुटका होत असल्याने मोहसीनच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.