Devendra Fadnavis Pimpri Chinchwad : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींचा नारा दिला जात होता तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोदी चोर है असा नारा दिला जात होता. पोलीसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका जखमी झाल्या आहेत. 


विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आले होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. फडणवीसांचा विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरादर घोषणाबाजीही केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेने एका अज्ञाताने चप्पल भिरकवली. ही व्यक्ती कोण होती आणि यामागे त्याचा काय उद्देश होता याचा शोध पोलीस घेतायेत. अटल बिहारी वाजपेयी उद्यानात प्रवेश करताना ही धक्कादायक घटना घडली. यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला असता हे लोक कोण होते मला माहित नाही, फालतू, चिल्लर लोक असतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


यांच्या बुद्धीची कीव येते
कोणी काळे, निळे, पिवळे कोणतेही झेंडे दाखवू दे. जनता बघतेय, ते फक्त स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी हे करत आहेत. एखादं चांगलं काम करून श्रेय घ्या, पण कामं करायची नाहीत अन दुसऱ्यांसमोर निदर्शन करायची. देव त्यांना सुदबुद्धी देवो. अण्णा साहेब पाटलांच्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नावाच्या उद्यान समोर आंदोलन करण्याची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडली. मला यांच्या बुद्धीची कीव येते, हे दुर्दैव्य आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


यांची बुद्धी तपासून पाहण्याची आवश्यकता -
स्वतः काही करायचं नाही. त्यांच्या  कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत. आमच्या महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करून दाखवलं. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये असूया आहे. पण, मला एका गोष्टीचं दुःख आहे. की, मराठा आरक्षणाकरता ज्या अण्णासाहेब पाटलांनी सर्वस्व पणाला लावलं आणि आपला जीव दिला. अक्षरशः बलिदान दिले. अण्णासाहेब पाटलांच्या पुतळ्याच्या उदघटनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचं काम आणि अटलजी यांना विरोध होण्याचं काम होत असेल, तर कुठेतरी यांची बुद्धी तपासून पाहण्याची आवश्यकता आहे.



शरद पवारांना टोला -
राज्यातील या सरकारला महाविकासआघाडी म्हणायचं की महावसुलीआघाडी म्हणायचं. मेट्रोचे श्रेय बरेच जण घेतात असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला. मेट्रोचे सर्व श्रेय फक्त मोदींचं आहे, असेही फडणवीस म्हणाले.  आता हे वॉर्डाची रचना बदलत आहेत. काय-काय बदलायचं ते बदला, आम्हाला काहीच फरक पडत नाही. या जनतेच्या विश्वासावर आम्ही या महापालिकेत पुन्हा बसू, असेही फडणवीस म्हणाले.