पुणे : तरुणांनी सैन्यात जावं तिथं चांगलं खाण्यासोबतच परदेशी दारुही प्यायला मिळेल, असं वादग्रस्त विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.


दलित समाजाला सैन्यात आरक्षणाची मागती करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. "बेरोजगार राहून हातभट्टीची देशी दारु पिण्याऐवजी सैन्यात भरती व्हावं, तिथे चांगलं खाणं इंग्रजी दारु प्यायला मिळेल," असंही आठवलेंनी सांगितलं.

आठवले म्हणाले की, "आर्मीमध्ये आम्हाला आरक्षण द्या. इथे बरोबर खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही. मिलिटरीमध्ये चांगलं खायला, प्यायला मिळतं. रम मिळते, ब्रॅण्डी मिळते."

याशिवाय सैन्यात मरण्यासाठी भरती होतात हा समज चुकीच असल्याचं आठवलेंनी सांगितलं. "दररोज हार्टअटॅक आणि रस्ते अपघातात मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सैन्यात लोक फक्त मरतात हा गैरसमज आहे," असंही आठवले म्हणाले.

सैन्यात दलित तरुणांना आरक्षणावर जोर देताना आठवले म्हणाले की, “दलित लढाऊ आहे. ते सैन्यात भरती झाले तर देशासाठी मोठं योगदान देऊ शकतील. यासाठी मी स्वत: वैयक्तिकरित्या प्रयत्न करेन.”