CM Eknath Shinde : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे (Pune) आणि जिल्हा परिसरात आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आहे. 


लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्या


पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर,  बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.


हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घ्यावी


संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम 


पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अशातच मावळ तालुक्यातील तिकोणा (वितंगगड) किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र, दरड कोसळल्यानंतर सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


महत्वाच्या बातम्या:


Lonavala Rain: लोणावळ्यात धुवाधार पाऊस! भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढला,पर्यटकांना बंदी