Pune Congress: पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावलेल्या फ्लेक्सची पोलिसांनी दखल घेतली आहे. सारसबागजवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसकडून लावण्यात आले होते. त्यानंतर सावरकरप्रेमींनी ते फ्लेक्स हटवले. त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे. महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटले आहे. राज्यातील अनेकांकडून राहूल गांधींच्या विधानाचा निषेध केला जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले आहे. सावरकरांच्या पुतळ्याच्या समोर माफीवीर आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स लावले यावरुन भाजप आणि कॉंग्रेसमध्ये वाद निर्माण झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून युवक प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात 153, 504, 188 कलम अन्वये स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


सावरकर प्रेमींनी हटवले प्लेक्स, रणजित सावरकरांचाही कॉंग्रेसवर पलटवार


सावरकर यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेले हे फ्लेक्स एका व्यक्तीने येऊन हटवले. ही व्यक्ती सावरकरप्रेमी असल्याचं सांगितलं जातं आहे. अशा प्रकारे फ्लेक्स लावणाऱ्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी भावना या व्यक्तीने बोलून दाखवली. या प्रकरणात आता सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसवर पलटवार केला आहे. सावरकर नव्हे तर नेहरूंनी देशद्रोह केला, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. नेहरू यांनी 1921 मध्ये नागरिकांना आयकर भरू नका, असं आवाहन केले होते. मात्र स्वत: तुरुंगात असताना आयकर भरला. चळवळीपासून द्रोह केलेल्या नेहरूंनी तीन दिवसात देशाची फाळणी काँग्रेसला न विचारता मान्य केली. हा देशद्रोह असून नाना पटोले आणि काँग्रेसने याचे उत्तर द्यावे, असे आव्हान रणजित सावरकर यांनी दिले आहे. 


काय म्हणाले होते, राहुल गांधी? 
एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.