पुणे :  "आतापर्यंत राज्याला केंद्र सरकारने काही दिलं तरी राज्य सरकार प्रत्येकवेळी केंद्र सरकारवर बोट दाखवत आहे. केंद्र सरकारने दरवेळी राज्याला मदत दिली आहे. प्रत्येक वेळी केंद्रावरच बोट दाखवायचं असेल तर राज्य केंद्र सरकारला चालवायला द्या" अशी टीका करत तुम्ही फक्त खुर्च्या गरम करायला सत्तेत बसला आहात का? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. 


"केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा निधी मिळाला नाही" असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलं होतं. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. 


चंद्रकांत पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज खूप दिवसांनी बाहेर पडले. आम्ही त्यांच्या तब्येतीसाठी वेळोवेळी प्रार्थना करत होतो. आमची इच्छा इतकीच होती की, मुख्यमंत्र्यांना प्रवास सहन होत नाही तर त्यांनी त्यांचा चार्ज दुसऱ्यांना द्यावा. कारण राज्य कारभार चालला पाहिजे".


ओबीसी आरक्षणाचा फक्त दिखावा 
ओबीसी आरक्षणावरूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली. "राज्य सरकार निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं करता येत नाही. ओबीसी आरक्षणाचा सरकार फक्त दिखावा करत आहे. आरक्षणाच्या धोरणावरून सरकारला कुठलीही निवडणूक पुढे ढकलता येणार नाही अशी तरतूद कायद्यात आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. 


महत्वाच्या बातम्या