बारामती : प्रत्येक क्षेत्रात संकटं ही येत असतात. साखर उद्योगावर पुढील वर्षी मोठं संकट उभं राहणार आहे. प्रचंड ऊस उत्पादन झालं आहे. मात्र जागतिक बाजारपेठच मंदावली आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखरेला 2500 रुपयांपर्यंतच दर मिळणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तवलं आहे.


बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पवार कृषी आणि शिक्षण पुरस्काराचं वितरण आज शरद पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं. यावेळी शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचं असल्याचं म्हटलं.

विशेष म्हणजे पुढील वर्षी केंद्र सरकारने ठरवून दिलेला ऊसाचा दर देणंही कारखान्यांना शक्य होणार नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. दुसरीकडे शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

जगातल्या साखर उत्पादक देशांनी प्रमाणापेक्षा जास्त साखर उत्पादित केल्यामुळे जागतिक बाजारपेठ मंदावली आहे. त्याचे परिणाम भारतातील साखर उद्योगांना भोगावे लागत असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

पूर्वी आयात करणारा देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र शेतकरी आणि संशोधकांच्या जोरावर आपला देश निर्यात करणारा बनला आहे. अशा परिस्थितीत राज्यकर्त्यांनी शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.