व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट झाल्याने तलवार-कोयत्याने हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2018 05:31 PM (IST)
सोशल मीडियाच्या वापरामुळे जसे लोक एकमेकांना जोडले जात आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यातील सहनशीलताही कमी होत चाललीय, असे गेल्या काही दिवसांतील घटनांवर समोर आले आहे.
इंदापूर (पुणे) : सोशल मीडिया जितका उपयुक्त तितकाच घातक असल्याचे दिवसागणिक विविध घटनांवरुन समोर येतंय. यातल्या अनेक घटना तर जीवावर बेतणाऱ्या असतात. याचंच एक उदाहरण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात उघडकीस आलं आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडलेल्या तरुणावर हल्ला करण्यात आला. लाथा-बुक्क्यांनी मारहाणीसह तलवार आणि कोयत्यानेही वार करण्यात आले. यात तरुण गंभीररित्या जखमी झालाय. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात ही खळबळजनक घटना घडली. निमगाव केतकीतल्या पानबाजारात काही तरुण कार आणि दुचाकीवरुन आले आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडलेल्या तरुणावर हल्ला केला. सोशल मीडियाच्या वापरामुळे जसे लोक एकमेकांना जोडले जात आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यातील सहनशीलताही कमी होत चाललीय, असे गेल्या काही दिवसांतील घटनांवर समोर आले आहे.