बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे पाण्याचे पूजन करण्यासाठी पोहोचले. जनाई योजनेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे बोरकरवाडी तलाव येथे सोडण्यात आले आहे. त्या पाण्याचे पूजन अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडले आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला. पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली. 1991 साली पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 6 लाख होती, 2041ला ती 61 लाख होईल, योजना करणं आमचं काम आहे. परंतु, त्याचा मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं...
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला सांगितलं आहे, तहसीलदाराला सांगितला आहे, पीआयला सांगितला आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. नाहीतर काका कुतवल. नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत, असंही अजित पवार मिश्किलपणे म्हणालेत.
भागात कुणालाच पाणी मिळत नव्हतं...
पुढे बोलताना ते म्हणाले, मी इथं अधिकाऱ्यांना घेऊन आलो, त्याचं कारण आहे की, मला काही गोष्टी कळतात. तिथे मुंबईला जर कुठला अधिकारी काय म्हटला तर मला सांगता येतं की, मी तिथे जाऊन आलोय. तुम्ही एअर कंडिशनमध्ये बसून सांगू नका. आधी या भागात कुणालाच पाणी मिळत नव्हतं, तुम्ही त्यावेळेस म्हणालात की, आम्ही जमिनी देतो. आम्हाला पैसे नको फक्त आम्हाला पाणी द्या. परंतु आता तुम्ही पैसे मागायला लागलेला आहात.आम्ही बंद पाईपद्वारे पाईपलाईन करणार आहोत. त्याच्यामुळे खाली जमिनीच्या तीन ते फूट पाईप टाकणार आहोत. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही शेती करू शकता, असंही पुढे अजित पवार म्हणाले.
पुरंदर योजनेचे पाणी आपल्याला 12 महिने मिळणार
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ज्यावेळेस मी पहिल्यांदा कृष्णा खोरे महामंडळाचा मंत्री झालो. त्यावेळेस मी पुरंदर उपसा योजना केली आहे. तलावात पाईप घालू नका, परकुलेशन झालेलं पाणी घ्या. पुरंदर योजनेचे पाणी आपल्याला 12 महिने मिळणार आहे. काल 345 वी शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी होती आम्ही अभिवादन केले. फुले वाड्यात जिथे सावित्रीबाई आणि महात्मा फुले राहायचे तिथे मी गेलो होतो. 200 कोटी रुपये स्मारकासाठी मी मनपाला दिले आहेत. नवीन नोकरी मिळाल्यावर तिकडे गेले पाहिजे. मी शेती करायचो, काटेवाडीत राहायचो. पण खासदार झाल्यावर गेलो ना मुंबईला.
5 वर्षाला आमदाराला मिळतात 25 कोटी. मी 100 दिवसात दीड हजार कोटी आणलेत. जनावरांचा डॉक्टर असलेला दवाखाना आणलेला आहे. एकाने मला सांगितलं, दादा कुत्र आजारी पडलं होतं. त्याला खूप खर्च झाला. त्याला विचारले किती? तर त्याने दीड लाख रुपये सांगितलं. मोठी लोकं असे खर्च करतात, असंही पुढे अजित पवार म्हणालेत.
मी जोपर्यंत लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत
यावेळी लाडक्या बहिणीकडे लक्ष दिले. त्यावेळी आमच्यावर टीका झाली. निवडणूक झाली योजना बंद करतील. पण, तसे आम्ही केलं नाही. योजना सुरू ठेवली.एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता, असं म्हणतात. कसा खाल्ला होता माहीत नाही, पण खाल्ला. मी जोपर्यंत लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी अडचण येऊ देणार नाही. पुरंदर विमानतळ काम हातात घेतले आहे. लोकं विरोध करत आहेत, पण विमानतळ केल्याशिवाय पर्याय नाही.त्यामुळे ते करणे भाग आहे.राहणीमान बदलत आहे. पूर्वी दोन लुगडी जोडून महिला घालायच्या. पूर्वी पँटीला ठिगळं असायची, आता श्रीमंताची मुले पॅन्ट फाडतात. आम्ही सरकार म्हणून बसलो आहे. मी गरीबावर अन्याय होऊ देणार नाही. कामे हवेत होणार नाही. त्यासाठी जागा लागेल. जातीय सलोखा असला पाहिजे. कुठे कायतरी झालं म्हणून मारहाण करायची हे चालणार नाही. आपण भारतीय आहोत. आपण शाहू, फुले,आंबेडकर यांचा विचाराने राहिले पाहिजे. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय चालत नाही. अजित पवार लगेच काका कुतवल यांना म्हणालो. नाहीतर लगेच तुम्ही काही केलं तरी समाधानी नाहीत. जिथं पिकतं तिथं विकत नाही, असंही अजित पवार म्हणालेत.
पूर्वी टॉवरचे काम होत होतं. त्यावेळेस एक रुपया मिळत नव्हता. परंतु ज्यावेळेस मी मंत्री झालो, त्यावेळेस पासून शेतकऱ्यांना पैसे देणे सुरुवात केली. मुंबई, पुणे, बारामती,पंढरपूर, हैदराबाद अशी बुलेट ट्रेन जाणार त्यात जमिनी जाणार आहेत. तुमचं भलं करण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावला आहे, असंही अजित पवार पुढे म्हणालेत.