पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात येत नाहीत. यावरून भाजपकडून मुख्यमंत्रीपद दुसऱ्या कोणाकडे तरी द्यावे अशी मागणी होत असतानाच आज सकाळी प्रसार माद्यमांसोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोंडून मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असा उल्लेख झाला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधान आले. परंतु या विषयावर पडदा टाकत "मी तसे बोललो असेल तर आदित्य हा शब्द मागे घेतो आणि उद्धव हा शब्द घेतो. आम्ही सभागृहात एखादा शब्द चुकला की म्हणतो की आम्ही तो शब्द मागे घेतो. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. 


यावेळी बोलताना अजित पवार यांनी कोरोना वाढत अल्याबाबत चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, "स्वतः कीटच्या साहाय्याने कोरोना चाचणी करणारे लोक अनेकदा पॉझिटिव्ह आलेले कळवत नाहीत. त्यामुळे आम्ही मेडीकल दुकानदारांना सांगितले आहे की किमान असे कीट विकत घेणाऱ्यांचे मोबाईल नंबर नोंद करुन घ्या. पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट सहा टक्क्यांवरून 17 टक्क्यांवर पोहचला आहे. मास्कशिवाय फिरणाऱ्यांकडून 46 लाखांचा दंड वसूल केला असून लोकांनी कोरोनाचे निर्बंध गांभीर्याने घ्यावेत, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 
 
"आसाममधे भरतीसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील सातशे तरुणांपैकी अनेक मुलं कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. आसाम सरकारच्या नियमानुसार त्यांना पाच दिवस अलगीकरणात राहावं लागेल. पण त्यांची परतीची तिकीटे 17 जानेवारीची आहेत. त्यामुळे त्यांना 16 तारखेला मोकळे करावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 


अजित पवार म्हणाले, "पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जंबो कोवीड हॉस्पिटल पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. या हॉस्पिटलसाठी लागणारा स्टाफ भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोक कोरोनाचे नियम पाळत नाहित त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे" 


  टाटा धरण ब्रिटिशांच्या काळातील पण...
 टाटा धरण ब्रिटिशांच्या काळात तयार झाले असून ते वीजनिर्मितीसाठी तयार करण्यात आले होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता लोकसंख्या वाढली आहे.  आता लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे. वीज तयार करण्यासाठी आता अनेक पर्याय आहेत. पाण्यावरच वीज बनवायला हवी असे नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी मिळावे अशी मागणी आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तो अहवाल कॅबिनेट समोर येईल आणि त्यानंतर यावर निर्णय होईल.


पुणे जिल्ह्यात विमानतळ होणार


 पुणे जिल्ह्यात विमानतळ होणार आहे. परंतु, ते कोठे होणार हे सांगण्याची सध्या गरज नाही. कारण त्याला फाटे फुटतात.  पण पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांना या विमानतळाचा फायदा होईल. या विमानतळासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या