पुणे : देशभर राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. या राममंदिराच्या निर्मितीवरुन देशात सुरु असलेल्या राजकारणावर अभिनेते नाना पाटेकर यांनी भाष्य केलं आहे. राममंदिराच्या निर्मितीपेक्षा गरीबांच्या पोटात दोन घास जाणं महत्वाचं असल्याचं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.


पुण्यात खडकवासला धरणातील गाळ उपसा करुन त्याला पुनरुज्जिवीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची 'नाम' संस्थाही सहभागी झाली आहे. ग्रीनथंब संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मणेवाडी भागात धरणातील गाळ उपसा करुन वृक्षारोपण करण्यात येत आहे.

"काही जणांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. मात्र एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मला मंदिरात गेल्यासारखच वाटेल. त्यामुळे कोणाला काय वाटतं यावर सगळं अवलंबून आहे. काही जणांना राम मंदिर बांधणं महत्त्वाचं वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे" असं नाना पाटकर म्हणाले.

देशभरातील शेतकऱ्यांना काढलेल्या किसान मोर्चावरही नाना पाटेकरांनी यावेळी भाष्य केलं. "गरजा पूर्ण होत नाहीत त्यावेळी असे मोर्चे निघतात. शेतकऱ्यांच्या गरजा, अपेक्षा पूर्ण होत नसतील, म्हणून हे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. एकटं सरकारही सगळ्या गोष्टी पूर्ण करु शकणार नाही. त्यामुळे सामाजिक संस्थानी पुढे येऊन मदतीचा हात गरजवंतांना दिला पाहिजे", असं मत व्यक्त केलं.

"कोणतंही सरकार जनतेच्या चागंल्यासाठी काम करत असतं. मात्र सगळ्या गोष्टी करणे सरकारला शक्य नसल्याने त्यांना आपण सहकार्य करणे गरजेचं आहे." मात्र मी कोणत्याही पक्षाचा नसल्याचंही नाना पाटेकरांनी यावेळी स्पष्ट केलं.