आंबेगाव (पुणे) : मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip  यांना आज (24 फेब्रुवारी) शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी थेट घाटातचं घेरल्याचा प्रकार घडला. दिलीप वळसे पाटील बैलगाडा शर्यतीचं घाट गाजवायला गेले, पण त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा जयघोषाने घाट दणाणून सोडले. परिणामी दिलीप वळसे पाटील यांची बोलती बंद झाल्याने त्यांची बारी फसली. वळसे पाटील आज त्यांच्या आंबेगाव विधानसभेच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिरूर तालुक्यातील पाबळ गावात ते पोहचले. गावात यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या घाटात वळसे पाटील पोहचले. यावेळी त्यांनी बारी मारण्यासाठी माईक हाती घेतला. 


आगामी निवडणुका लक्षात घेता, वळसे पाटील यांनी पाण्याचा प्रश्न पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सोडवू असं आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा विजय असो, अशा घोषणा देत घाट दणाणून सोडला. हे पाहून वळसेंनी स्मिथ हास्य केलं अन पवार साहेबांवर माझंही प्रेम आहे. चाळीस वर्षे मी त्यांच्यासोबत होतो. मात्र, बदलेल्या परिस्थितीमुळं आज मी त्यांच्यासोबत नाही. यावर मी राजकीय व्यासपीठावरून बोलेन असे म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, सध्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, तो मी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. यापुढं फार काही बोलत नाही, असं म्हणून वळसे पाटील यांच्यावर भाषण आटोपते घेण्याची 'वेळ' आली. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी अशा रीतीने वळसे पाटील यांची बारी फसवली.


सगळं देऊन पाच टक्के सुद्धा निष्ठा पाळली नाही


दरम्यान, आंबेगाव मतदारसंघात शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दौरा करताना वळसे पाटलांना पराभूत करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले की, तुमच्या तालुक्यातील अनेकांनी माझ्यासोबत काम केलं आहे. अनेकांनी प्रामाणिकपणे काम केलं, ते हयात नाहीत. निष्ठा ही त्यांचं वैशिष्ट्य होतं, पण आज काय पाहतो आपण? त्यांना आम्ही सगळं दिलं. विधानसभा, मंत्री, विधानसभा अध्यक्ष पद, साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पद दिलं. मात्र, त्यांनी पाच टक्केही निष्ठा पाळली नाही. ते निघून गेले. असे लोक नागरिकांशी सुद्धा निष्ठा पाळणार नाहीत. त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, असे सांगत मानसपुत्र दिलीप वळसेंना पराभूत करण्याचं आवाहन केले. 


इतर महत्वाच्या बातम्या