पुणे : पुण्यातील धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या (Accident) नवदाम्पत्याला घेऊन जाणारी रिक्षा सासवडजवळ विहिरीत पडली. या अपघातात नवदाम्पत्यासह एका तरुणीचा मृत्यू झाला. तर दोन जणांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नव विवाहितांची रिक्षा सासवडनजिक बोरगावकेमळा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली. यामध्ये या नवविवाहित दाम्पत्याचा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या पुतणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. 


संसाराला सुरुवात होण्याअगोदरच या नवविवाहितांचा दुर्दैवी शेवट झाला आहे. सोमवारी (25 सप्टेंबर) रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर या नवदाम्पत्याचा आणि रिक्षातील असलेल्या इतर व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबियांशी असलेला संपर्क तुटला होता. आज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या मुलांना विहिरीतून वाचवा वाचवा असं कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या आणि यानंतर ही माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली. सासवड पोलिसांनी दोघांना सुखरुप बाहेर काढलं आहे. मात्र यात नवविवाहित जोडपं आणि एका तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रावणी संदीप शेलार (वय 17 वर्ष), रोहित विलास शेलार (वय 23 वर्षे ), वैष्णवी रोहित शेलार (वय 18 वर्षे) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर या अपघातात आदित्य मधुकर घोलप (वय 22 वर्षे), शितल संदीप शेलार (वय 35 वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


शेलार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर


दोन दिवसांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. त्यानंतर दोघेही कुटुंबातील काही जणांसोबत जेजुरीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेतलं, भंडारा उधळला, पूजा पाठ केला आणि नव्या संसाराची स्वप्न रंगवत शेलार कुटुंबीय माघारी निघाले होते. त्यावेळी पुण्याकडे जात असताना त्यांच्या रिक्षाचा ब्रेक फेल झाला आणि रिक्षा थेट विहिरीत कोसळली. त्यात नवदाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूने शेलार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


दोघे रात्रभर सळईला लटकून...


हा अपघातात जखमी असलेले आदित्य शेलार आणि शितल शेलार यांनी आपला मृत्यू डोळ्यादेखत पाहिला. रिक्षा विहीरीत कोसळल्यानंतर या दोघांनी विहिरीतील सळईला धरुन ठेवलं होतं. रात्रभर दोघेही सळईला लटकून होते. सकाळी आवाज आल्याने सगळी सूत्र हलवत या दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. मात्र त्या दोघांना आपल्या प्रियजनांच्या मृत्यू जवळून पाहावा लागला. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Accident: नगर - कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच शेतमजुरांना चिरडले, तिघांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु