पुणे : पुण्यातील विविध कारणांनी चर्चेत असलेलं जम्बो कोविड केअर रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या रुग्णालयातून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्ण गायब झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. वारंवार विचारणा करूनही रुग्णालय प्रशासन दाद देत नसल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. जोपर्यंत रुग्णालय प्रशासन मुलीची माहिती देत नाही तोपर्यंत जम्बो कोविड रुग्णालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे या महिलेच्या आईने सांगितले. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

संबंधित महिला मनोरुग्ण असून ती पतीपासून वेगळी राहते. येरवड्यात ती आईसोबत राहत होती. येरवड्यातील मनोरुग्णलयात तिच्यावर उपचार सुरू होते. महिलेची आई रागिणी गमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा झाल्यामुळे 33 वर्षीय मुलीला 29 ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्याच दिवशी तिला जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे रागिणी गमरे या घरी निघून गेल्या. त्यानंतर 13 सप्टेंबरला क्वॉरंटाईन कालावधी संपत असल्यामुळे त्या 12 सप्टेंबरला परत जम्बो कोविड रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना उद्या येऊन तुमच्या मुलीला घेऊन जा असे सांगण्यात आलं. त्यामुळे रागिणी गमरे या 13 सप्टेंबरला पुन्हा जंम्बो रुग्णालयात गेल्या. मात्र त्यांना तुमची मुलगी सापडत नसल्याचे सांगण्यात आले. सापडली की तुम्हाला कळवू असं सांगून त्यांना परत पाठवण्यात आले.

त्यानंतर रागिणी त्याच रात्री नातेवाईकांसोबत जम्बो रुग्णालयात गेल्या असता तुमच्या मुलीला चार दिवसांपूर्वीच डिस्चार्ज दिल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईकांनी संपूर्ण पुणे शहरात शोधाशोध केला, पण त्यांना संबंधित महिला सापडली नाही. त्यानंतर रागिणी गमरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी मुलगी हरवल्याची तक्रारही दिली. परंतु अद्यापही तिचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी आणि जम्बो कोविड रुग्णालय प्रशासनाकडून मुलीविषयी माहिती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे रागिणी यांनी सांगितले.

चित्रा वाघ यांनी घेतली कुटुंबियांची भेट

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये महिल्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. अजून किती  महिलांवर क्वॉरंटाईन सेंटरमध्ये अत्याचार झाल्यावर सरकार नियमावली जाहीर करणार आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय. चित्रा वाघ यांनी जम्बो कोविड सेंटरच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले