मुंबई : राज्यभरात पुढच्या पाच दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातले काही जिल्हे आणि कोकणात अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


मध्यप्रदेशपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला. नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली असून शिरूर आणि अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.

दिवसभर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर राज्यभरात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.

दरम्यान ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने आंबा, द्राक्ष तसंच इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यावर मोठं संकट आहे.