MNS Raj Thackeray , वरळी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर आहे. आत्तापर्यंत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, आज राज ठाकरेंची वरळीत सभा पार पडली. या सभेत त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांचं कौतुक केलं. संदीप देशपांडे यांनीही वरळीसाठी आपलं व्हिजन मांडलं. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आपल्या पुतण्याविरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. 


राज ठाकरे काय काय म्हणाले? 


संदीप हा राजकीय दृष्ट्या किंवा आपल्या भागाबद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे. विषयावर बोलणारा आहे. काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो आणि होणार नसेल तर नाही म्हणून सांगतो. आज त्याने वरळी व्हिजन ठेवलं आहे. पण उद्या जेव्हा बाहेरून लोक येऊन वरळीचा मातेरं होईल तेव्हा पश्चातापाचा हात डोक्यावर मारू नका. बाकीच्या सगळ्या निघून जातील कोणी हाताला लागणार नाही. पण आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. जे चांगलं काम करत आहे ते त्यांच्या पाठीवर शाबासकी पडणार आहे की नाही?


राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 7 उमेदवार


1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. वणी - राजू उंबरकर


बाळा नांदगावकर म्हणाले,  मी किंवा कुठलाही माझा नगरसेवक तुमच्याकडे टक्केवारी मागायला येणार नाही, पण काम चोख असलं पाहिजे. मगाशी काका म्हणाले तेच की एकदा संधी द्या. या मतदारसंघात मी लोकसभा दोन वेळा लढवली. वरळीकरांनी मला प्रचंड मतदान केलं. त्याच वरळीकरांना माझी हात जोडून विनंती आहे की साहेबांच्या हाकेला ओ द्या...प्रत्यक्ष त्यांच्या हातात काही दिलं तर ते बरच काही करू शकतात...निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी रेल्वे इंजिन लक्षात ठेवा, असं आवाहनही बाळा नांदगावकर म्हणाले. 


शाळेच्या पुनर्विकासाचा प्रश्न किंवा एसआरएचा प्रश्न गंभीर 


संदीप देशपांडे म्हणाले, मागील तीन-चार महिन्यांपासून आपण वरळीच्या प्रत्येक घराघरात जाऊन फिरत आहोत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत. मत मागायला नाही तर मत जाणून घ्यायला येत आहोत अशा प्रकारे कॅम्पेन आम्ही राबवलं. शाळेच्या पुनर्विकासाचा प्रश्न किंवा एसआरएचा प्रश्न गंभीर आहे. पार्किंगची समस्या आहे. प्रशांत गोंधळ आणि घोळ या सर्व लोकांनी घालून ठेवला आहे. 


धारावीला स्पेशल टीसीआर मिळतो तर वरळीला वेगळे नियम का केले जात नाहीत? 


शाळेचा प्रश्न गंभीर आहे. या सगळ्यावर उपाय म्हणजे वरळी विजन आपण कार्यक्रम आयोजित केला. पोलीस कॅम्पचा विषय आहे त्याचाही पुढे काही झालं नाही. धारावीला स्पेशल टीसीआर मिळतो तर वरळीला स्पेशल डी सी आर किंवा वेगळे नियम का केले जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे. डेव्हलपर आणि झोपडपट्टी मधील लोकांची रोज भांडण होत आहेत. यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा आपण का देऊ नये? असा सवालही देशपांडे यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Khadse : माझा भाजप प्रवेश गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला, एकनाथ खडसेंनी पुढची दिशा सांगितली