मुंबई : राज्यातील पक्षफुटीनंतर सातत्याने पक्षातील आमदार परत येणार असल्याची चर्चा आणि दावा संबंधित राजकीय पक्षांकडून केला जातो. शिवसेना पक्षातील फुटीनंतरही असा दावा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. मात्र, आता जे गेले आहेत, त्यांना परत घेणार नसल्याचं स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमवेत गेलेले आमदारही परत शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याचा दावा शरद पवार (Sharad Pawar) गटातील काही नेत्यांकडून केला जातो. यासंदर्भात अजित पवारांनीही स्पष्टीकरण देताना कोणीही कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतरही सर्वच आमदारांची बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आता, पुन्हा एकदा या आमदारांबाबत अजित पवारांनी खासगीत बोलताना खरमरीत प्रतिक्रिया दिली. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातत्याने आमदार परत येणार असल्याबाबतच्या चर्चा होत असतात. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडूनही असा दावा करण्यात आला होता. आता, याबाबत अजित पवारांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासोबत असलेले आत्ताचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, असे अजित पवार यांनी खासगी बोलल्याची माहिती सुत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या अनेक नवे उमेदवार आहेत. आम्ही एकत्रित असताना अनेक नव्या चेहऱ्यांना मी संधी दिली आणि आज ती सर्व मंडळी चांगल्या पदावर काम करत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यामुळे, अजित पवारांनी आमदारांना एकप्रकारे इशाराच दिला असल्याचे दिसून येते. 


निलेश लंके याला संधी देण्यामध्ये मीच पुढाकार घेतला होता, असेही अजित पवारांनी सांगितले. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके सुरुवातीला माझ्याकडून तयार होते. मात्र, मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी अशी त्यांची मागणी असल्याची अजित पवार यांची ऑफ द रेकॉर्ड माहिती आहे.  यासंदर्भात मी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, त्यांचा विद्यमान खासदार असल्यामुळे ते जागा सोडू शकले नाहीत. ही जागा धोक्यात आहे, असेही मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं. पण,  भाजपच्या नेत्यांनी ऐकलं नाही, असेही अजित पवारांनी म्हटल्याचे समजते.


राष्ट्रवादीचं 288 जागांवर सर्व्हेक्षण 


दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 288 जागांचा सर्व्हे करणार आहे. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या, त्या सर्वच जागांवर आमचा दावा असेल. यासोबतच इतर जागांचा देखील आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात येणार आहे. या जागांमध्ये नवाब मलिक यांचा देखील समावेश असेल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. सर्व्हेमध्ये 288 जागांमध्ये ज्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दावा सांगण्यात येणार असल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी अनपौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं आहे.  


हेही वाचा


Video : एक लग्न असंही...नवरदेव खांद्यावर, वऱ्हाडी पाण्यात; नदीवर पूल नसल्यानं लग्नकार्याला आलं विघ्न