Bajrang Sonawane: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी भेट घेतली. या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. जवळपास अर्धा तास ही बैठक झाली. या बैठकीत खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील मुद्दे मांडले. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोदींच्या भेटीनंतर कोणकोणत्या मागण्या याची माहिती दिली. 

Continues below advertisement

सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे

खासदार बजरंग सोनवणे यांनी मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. पावसाळ्याचे अडीच महिने उलटूनही पाऊस न पडल्याने नद्या कोरड्या ठाकल्या आहेत. गोदावरीचा अपवाद वगळता एकाही नदीला पाणी आलेले नाही. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या संकटसमयी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली.  तसेच सन 2025-26 चा पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे थकीत पीक विमा आणि नुकसानभरपाई त्वरित देण्याची मागणी त्यांनी केली.

बजरंग सोनवणेंनी कोणत्या मागण्या केल्या? 

  • प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या सन २०२५–२६ मधील प्रलंबत दाव्यांचे त्वरित पैसे अदा करावेत आणि २०२६–२७ पासून अ‍ॅड-ऑन कव्हर पुन्हा लागू करावे.
  • ऊसतोड कामगरांच्या मुलांसाठी हंगामी/फिरत्या शाळा तसेच स्थानिक रोजगाराची व्यवस्था करावी.
  • कृषी आधारित उद्योग, अन्न प्रक्रिया, MSME आणि कौशल्य विकासाला चालना देऊन रोजगाराच्या संधी वाढवाव्यात.
  • धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाला गती द्यावी आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.
  • बीडमध्ये मेडिकल कॉलेज व सुपर स्पेशालटी आरोग्य सुविधा तसेच अंबाजोगाईत ५० खाटांचे क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर करावे.
  • एफपीओ, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस आणि कृषी प्रक्रिया सुविधांचा विस्तार करावा.
  • बीडमधील धार्मिक व पर्यटनस्थळांचा केंद्रीय योजनांच्या माध्यमातून विकास करावा.

'एनडीए'सोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष महायुती किंवा एनडीए (NDA) मध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर खासदार सोनवणे यांनी स्पष्ट शब्दांत पडदा टाकला. "आम्ही 100 टक्के नव्हे तर 100 टक्के विरोधी पक्षातच राहणार आहोत," असा दावा त्यांनी केला. विमानात सत्ताधारी नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठींवरून विनाकारण संशय व्यक्त केला जात असल्याचे सांगत ते म्हणाले, "प्रवासादरम्यान योगायोगाने भेटी होणे स्वाभाविक आहे. यापूर्वीही विरोधी पक्षाचे नेते लोकहितार्थ सत्ताधाऱ्यांना भेटत होते. परंतु, अशा भेटींचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही." पक्षाची भूमिका ठाम असून आपण विरोधी पक्षाच्या बाकावरच बसून जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

संसदेचे कामकाज ठप्प होण्यास सत्ताधारीच जबाबदार

संसदेचे कामकाज सुरळीत चालवणे ही सत्ताधारी पक्षाची प्राथमिक जबाबदारी असते, असे मत खासदार सोनवणे यांनी मांडले. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करणे आवश्यक असते. परंतु, सरकार विरोधकांशी संवादच साधत नसेल तर मार्ग कसा निघणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळेच सभागृह चालत नसून याला पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे. विरोधी पक्ष आणि इंडिया (INDIA) आघाडी जो काही निर्णय घेईल, त्याच्यासोबत आपला पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील, असेही त्यांनी नमूद केले.

इतर महत्वाच्या बातम्या