Vinayak Raut on Ajit Pawar : "रामाच्या नावावर धंदा करणारे हे दलाल आहेत. विरोधी पक्षाला तुम्ही लोकसभेत जागा दाखवून दिलीये. अजित पवारांचा पक्ष तर दुर्बिणीने शोधावा लागेल. काही गद्दार पैशाच्या जोरावर निवडून आले, पण विधानसभेत 195 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. या सरकारचे दिवस आता भरलेत, त्यामुळे कोणत्या कोणत्या घोषणा करत आहेत" असे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. 


मुंबईचे प्रकल्प नेले आता मुंबईचं गुजरातला न्यायचा यांचा प्लॅन 


विनायक राऊत म्हणाले, आधी मुंबईचे प्रकल्प नेले आता मुंबईचं गुजरातला न्यायचा यांचा प्लॅन आहे. त्यासाठी शिवसेना संपवणे गरजेचं आहे. म्हणून उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ही राक्षसची फौज लागली. भ्रष्टाचाराच्या पक्ष म्हणून भाजपचे नाव रेकॉर्ड बुक मध्ये नोंद करावे लागेल. मुंबई काय एक इंच जमीन गुजरातला न्यायचा प्रयत्न केला तर प्रयत्न करणाऱ्यांचे हात तोडले जातील.  विधानसभा निवडणुकीत सोलापुरात ही शिवसेनाचं अस्तित्व दाखवावं लागेल. 


हिंमत असेल तर फॉर्म न भरता थेट लाडकी बहिणीच्या खात्यावर पैसे जमा करा


संपूर्ण देश हा एक उद्योगपती चालवतोय.  लाडकी बहीण योजना आशा सेविकांना सांगितलं, परवा एक आशा हे काम करीत होती, तेव्हा बिचारीचा मृत्यू झाला. अहो कसले फॉर्म भरता तुमच्याकडे डेटा आहे, हिंमत असेल तर फॉर्म न भरता थेट लाडकी बहिणीच्या खात्यावर पैसे जमा करा. आजपर्यंत किती घोषणा केल्या त्यापैकी किती घोषणा पूर्ण केल्या? असा सवालही विनायक राऊत यांनी केला. 


पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री असताना माहेरचा आधार ही योजना घोषित केली,  पण आजही योजना कुठे आहे शोधावे लागेल. सहा महिन्यात योजना बंद केली.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये देणार घोषणा केली पण साडे तीनशे पैसे दिले नाहीत.  लोकांची फसवणूक समजू शकतो पण विठ्ठलाच्या समोर खोटं बोलणं त्यांना पांडुरंग कधीही माफ करणार नाही. 


 पांडुरंगाच्या साक्षीने खोट्या थापा मारणारा मुख्यमंत्री आपल्याला पाहावं लागलं हे दुर्दैव 


आमच्यावर आरोप करतात आम्ही हिंदुत्व सोडलं, पण काल परवा शंकराचार्य मातोश्रीवर आले होते त्यांनी मनातील खंत व्यक्त केली.   उद्धवजींच्या कार्याशी स्पर्धा न करता दिल्लीच्या शक्तीचा वापर करून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. राम मंदिराच्या प्रतिष्ठापना आम्ही समजू शकतो पण ह्यांनी रामाचे लग्न लावलं आणि त्याच्या अक्षता तुम्हाला वाटल्या. आता ज्यांनी अक्षता वाटल्या त्यांना रामाची शपथ देऊन विचारा की या अक्षता खरच अयोध्येमध्ये आणल्या की इथं सोलापुरच्या बाजारातून  घेतलं आमच्या कणकवली मध्ये यांनी असच तांदूळ खरेदी करून वाटले.   पांडुरंगाच्या  साक्षीने खोट्या थापा मारणारा मुख्यमंत्री आपल्याला पाहावं लागलं हे दुर्दैव आहे, अशी खंतही विनायक राऊत यांनी व्यक्त केली. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ladki Bahin Yojana : मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचं आणखी एक पाऊल, दोन समित्या स्थापन, रक्षाबंधनाला 3 हजार खात्यात!