Thackeray Group MLA Meeting : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची आज (13 मे) मातोश्री (Matoshree) इथे बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारांना, नेत्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही (Karnataka Election Results 2023) चर्चा झाली. भाजपचं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही. भाजपला कर्नाटकातून घालवलं आता महाराष्ट्रातूनही घालवू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.


सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात मोठा निकाल दिला. 16 आमदारांच्या अपात्रेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार वाचलं. सोबतच तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले. तसंच शिंदे गटाने प्रतोदपदी केलेली भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली.  


मातोश्रीवरच्या बैठकीत काय झालं?


आमदारांच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा झाली. सर्व आमदरांना हा निकाल समजावून सांगण्यात आला. हा निकाल आपल्या बाजूने कसा आहे हे सांगण्यात आलं. "आता हा निकाल लोकांपर्यत पोहोचला पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे म्हणजे लोकांचा या निकालावर विश्वास वाढेल," असं उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितलं. 


तसंच पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांनाही असेच आदेश दिले जातील. 


कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातून घालवू : उद्धव ठाकरे


बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election 2023) निकालावर चर्चा झाली. दक्षिणेचा पट्टा भाजपच्या हातून निसटला आहे. भाजपला कर्नाटकात नाकारलं आहे. भाजप फोडाफोडीचं राजकारण करतं आहे, हे लोकांना आवडलेलं नाही. कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातूनही घालवू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला. 


दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कलांनुसार काँग्रेसला संपूर्म बहुमत मिळालं आहे. काँग्रेसने 130 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला 70 हून कमी जागांवरच आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपला इथे लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागणार आहे.