सोलापूर : काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राचे लक्ष वेधले. कारण, मोहोळ (solapur) तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी असले तरी माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. मागील अनेक वर्ष राष्ट्रवादीत राहिलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच भाजपत प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या अनगर गावातली ही निवडणूक सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. 

Continues below advertisement


सोलापूर जिल्ह्यात 11 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतसाठी निवडणूक घोषित झाली. मात्र, या सर्वापैकी चर्चा सर्वाधिक चर्चा होतेय ती मोहोळ अनगर पंचायतीची. अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होतेय. मात्र, ही पहिलीचं निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलीय. ती ही एका महिलेच्या उमेदवारीमुळे.. उज्वला थिटे या महिलेने अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण हे करण्यापूर्वी त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपमुळे हे प्रकरण चर्चेत आले. अनगर हे माजी आमदार राजन पाटील यांचे मूळ गाव, मागील 60 वर्षांपासून ह्या गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. काही महिन्यापूर्वी अनगर नगरपंचायत झाली आणि ज्यासाठी पहिल्यांदा निवडणूक होतेय. ही निवडणूक देखील बिनविरोध व्हावी म्हणून राजन पाटील यांचे प्रयत्न सुरु होते. नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी त्यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांचा भाजपतर्फे अर्ज दाखल केला. मात्र, राजन पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले उमेश पाटील यांनी आव्हान देण्याचा निर्णय घेतला. 


मोहोळच्या दोन पाटलांचा वाद काय? (Mohol Rajan patil contraversy)


मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या दोघांचे नावं कायम चर्चेत राहते. राजन पाटील हे अनगरचे तर उमेश पाटील हे मोहोळ तालुक्यातल्या नरखेडचे रहिवासी. निवडणूक कुठलीही ही असली तरी ह्या दोघा पाटलांचा वाद-प्रतिवाद कायम पाहायला मिळतो. ह्या नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका देखील त्याला अपवाद ठरल्या नाहीत. अनगर पंचायत बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला छेद देण्यासाठी उमेश पाटलांनी गावातीलच असलेल्या उज्वला थिटे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी जाहीर केली.


उज्वला थिटे कोण? राजन पाटलांसोबत वाद काय? (Rajan patil and ujjwal thite)


उज्वला महादेव थिटे ह्या मुळच्या सोलापूर शहरातील रहिवासी, 2000 साली अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत लग्न झालं. उज्वला आणि महादेव याना जयवंत हा मुलगा झाला. 2020 साली महादेव थिटे यांचं कोरोना आणि कावीळ झाल्याने निधन झालं. जवळपास 23 वर्षे अनगरमध्ये राहिल्यानंतर राजन पाटील आणि उज्वला थिटे यांच्या कुटुंबीयांचे कोणतेही वाद नव्हते. मात्र, 2023 साली पहिल्यांदा राजन पाटील यांच्या कुटुंबीयांसोबत वाद झाल्याचे थिटे यांनी सांगितले. त्यांच्या दाव्यानुसार 21 फेब्रुवारी 2023 रोजी गावात शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं. त्यावरून वाद झाले आणि जयवंतला मारहाण झाली, प्रकरण पोलिसांत गेले आणि जयंवत थिटेवर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हाही नोंद झाला. हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी आपण राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा उज्वला थिटे यांनी केला. मात्र, त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने त्रास देणे सुरूच राहिल्याने 29 एप्रिल 2023 रोजी  त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे वाद आणखीच चिघळला, घरावर दगडफेक होऊ लागली आणि जीवितास धोका निर्माण झाल्याने आपण गाव सोडलं असा दावा उज्वला थिटे यांनी केला आहे. 


उज्वला थिटे अन् पाटील वादाची संधी उमेश पाटलांनी साधली 


उज्वला थिटे ह्या तेव्हापासूनचं राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर सातत्याने टीका आणि आरोप करतात. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी राजकीय व्यासपीठावर जाऊन राजन पाटील यांच्यावर टीका केली. अनगर गावात राजन पाटील यांची दहशत असल्याचा आरोप त्यांनी सातत्याने केला. हीच दहशत मोडीत काढण्यासाठी आपण यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत राजन पाटील यांच्या सुनेच्या विरोधात अर्ज दाखल करणार असल्याचे सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश  पाटील यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली. पारंपरिक प्रतिस्पर्धी विरोधात राजकीय खेळी करण्याची संधी साधतं उमेश पाटलांनी ही उज्वला थिटे याना उमेदवारी जाहीर केली. 


उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच राजकीय नाट्य


उज्वला थिटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी पहाटे 5 वाजता पोलीस सरांक्षणात अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या. महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने कोणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्याची घटना घडली, त्यामुळे त्याची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. उज्वला थिटे यांच्या दाव्यानुसार मागील तीन-चार दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न होता. मात्र राजन पाटील यांच्या समर्थकाकडून उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये यासाठी दबाव आणला जातं असल्याचा आरोप उज्वला थिटे यांनी केला. अनगरला जाणारे रस्ते ट्रॅक्टर लावून अडवण्यात आले, हातात काठ्या आणि शस्त्र असलेल्या तरुणांनी पाठलाग केला असा गंभीर आरोपही उज्वला थिटे यांनी केला. शिवाय पोलिसांनीही सहकार्य केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं. प्रकरण तापत असल्याचे पाहून पोलिसांनी देखील शस्त्रधारी पोलिसांसह जवळपास 50 पोलिसांचा बंदोबस्त उज्वला थिटे यांना दिला. विरोध होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पहाटे पाच वाजताच त्या अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या. 


उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जामुळे अनगरच्या बिनविरोध परंपरेला छेद (First election in angar)


मागील 60 वर्षांपासून अनगर ग्रामपंचायत ही बिनविरोध होतं होती.  यंदाची नगरपंचायत निवडणुकीतील 17 सदस्यांच्या जागा देखील बिनविरोध झाल्या. मात्र नगराध्यक्ष पदासाठी राजन पाटील यांच्या सुनेच्या विरोधात उज्वला थिटे यांनी अर्ज भरल्याने नगराध्यक्ष पद बिनविरोध होऊ शकले नाही. ह्या सगळ्या राजकीय नाट्यनंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. 


अनगरमध्ये राजन पाटलांचे जंगलराज - उमेश पाटील (Umesh patil NCP)


60 वर्षानंतर पहिल्यांदा अनगर या गावामध्ये लोकशाहीचा उदय झाला. दंडेलशाही आणि झुंडशाहीच्या जोरावर लोकशाहीच्या मार्गाने ग्रामपंचायतीला अर्ज भरू दिले जात नव्हते. त्यामुळे अनगरची ग्रामपंचायत जी आता नगरपंचायत झाली आहे, ती बिनविरोध होत होती. लोकशाहीचा गळा त्या ठिकाणी दाबण्यात येत होता. उज्वला थिटे यांनी वाघिणीचं दूध पिलेलं आहे. या रणरागिणीने एकटीने जाऊन अनगर गाठलं आणि पोलिसांना फोन लावला. त्यावेळेस पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित झाली. एका महिलेचा अर्ज दाखल करण्यासाठी AK47, स्टेनगन घेतलेले जवान त्या ठिकाणी तैनात होते. यावरून राजन पाटील यांचे जंगलराज दिसून येतं अशी टीका उमेश पाटलांनी केली.


बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लढवत आहेत - राजन पाटील (Rajan patil mohol election)


माजी आमदार राजन पाटील यांनी देखील या सगळ्यांनंतर आपली बाजू स्पष्ट केली. मागील 40 वर्षापासून आमच्यावर अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही. तुम्ही ग्रामस्थांना विचारा, ते सांगतील, मी माझे समर्थन करेल मात्र गावकरी का करतील? इथे जन्म झालेल्या लोकांना विचारा इथे दादागिरी आहे की लोकशाही? एखादं गाव दहशतीत पाच ते दहा वर्षे चालू शकतं. मात्र दोन-दोन पिढ्या गाव दहशतीत चालू शकत नाही. अनगरचे लोक सधन आणि सुज्ञ आहेत. मात्र पूर्वजांनी एकोप्याने राहण्याचे शिकवले आहे. त्यामुळे तिसऱ्या पिढीतही दादागिरी न करता समन्वयाने बिनविरोध निवडणूक होते. मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षाची अवस्था अशी आहे की, त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले पक्ष आणि पक्षाचे नेते बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लढवत आहेत. दुसरं कारण भाजपची नगरपंचायत बिनविरोध होते, यातून केलेले हे कृत्य आहे.  दोन तारखेला निवडणूक आहे. जनता जनार्दन दाखवून देईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे राजन पाटील यांनी म्हटले.


हेही वाचा


एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका