पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांचे बारामती दौरे वाढल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील (Baramati) व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थिती दर्शवत बारामतीच्या विकासासाठी वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घ्यायला मागेपुढे पाहणार असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात पोहोचले असून तेथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी, नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केलं. तसेच, लोकसभा निवडणुकीत येथील जनता आपल्या पाठिशी राहिली. गेल्या 57 वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या पाठिशी आहात, असेही पवार यांनी म्हटले. दरम्यान, येथील भाषणातून शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केलं. अजित पवारांनी (Ajit Pawar) निवडणूक काळात केलेल्या दमदाटीच्या भाषणावर थेट हल्लाबोल केला.  


गेले काही वर्ष या भागाचे प्रश्न असतील ते दुसऱ्यावर टाकले होते,आणि मी राज्य आणि देश पातळीवर काम करण्यासाठी वेळ घालवला. मात्र, यावेळी एक वेगळी स्थिती निर्माण झाली असून आज इकडे 10-15 लोक असे दिसत आहेत की, जे 56 वर्षांपूर्वी साथ देणारे आजही इथच आहेत. इथं अनेकजण माझ्यासोबत काम करत होते. या भागात येताना काळजी घ्यावी लागत असे, पण मी गेले 56 वर्ष निवडणूक लढलो आणि जिंकलो. पहिली निवडणूक सोपी नव्हती,कष्ट घ्यावे लागले, हा भागात नंतर तुम्ही सांभाळला, मी राज्यात फिरत होतो. नंतर तीन वेळेला लोकसभेला सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिले, तर देशाच्या लोकशाहीत मलाही निवडून दिले.


यंदाची लोकसभा निवडणूक सोपी नव्हती,देशात आणि जगभर देशभर गेली. अनेकांना चिंता होती काय होईल कसं होईल, सत्ता हातात नाही, राज्याची सत्ता नाही. त्यातच, काही लोकांना फोन येऊ लागले, प्रेमाने, दमदाटीही केली, जे माहिती नव्हतं ते या निवडणुकीत पहिला मिळालं. मात्र, या निवडणुकीत लोक पुढे येतच नव्हते, न बोलणारी ही निवडणूक होती. मात्र, ज्या गावात लोक पुढे येत नव्हते, तिकडे मतदान झालं. लोक बोलत नव्हते पण त्यांना सागवा लागलं नाही आणि लोकांनी तुतारी दिल्लीला पाठवली, असे म्हणत बारामतीकरांनी न बोलता करेक्ट कार्यक्रम केल्याचं शरद पवार यांनी सूचवलं. 


दमदाटी करणाऱ्यांची नोंद मतदारांनी घेतली नाही


आता, साहजिकच लोकांच्या कामासाठी आम्हाला अधिक लक्ष घालावं लागेल. आज मोदींची सत्ता आहे, आपली सत्ता नाही, एक वेगळा विचार दाखवायला सुरुवात केली. मोदी समोर कोणी टिकणार नाही, असं बोलले. मोदींनी राज्यभर 16 सभा घेतल्या, प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं हे माझे भाग्य समजतो. मात्र, लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 जागा लढलो आणि 31 जिंकलो, राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 ठिकाणचे उमेदवार विक्रमी मतांनी जिंकून दिले. पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, इतर कोणीही असो, दमदाटी करणाऱ्याची नोंद मतदारांनी घेतली नाही, त्यांनी आपलं मतदान योग्य ठिकाणी केले, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. 


सत्ता हाती घ्यावी लागेल


आज अनेक प्रश्न आहेत,ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी ते सोडवले नाहीत, त्यांची जबाबदारी होती पण आता आम्हाला लक्ष घालावं लागले (हे नीट ऐकावे). बाळांनो इतके वर्ष आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे विचारले पाहिजे. तुमचा आम्हाला निकाल घ्यावा लागेल. सत्तेचा गैर वापर करणाऱ्याना त्यांची जागा दाखवावी लागेल. आपल्याला सत्ता बदलावी लागेल, सत्ता हातात घेतली पाहिजे, असेही शरद पवारांनी म्हटले.