हिंगोली : प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. प्रहार संघटनेचे सध्या राज्यात दोन आमदार असून स्वत: बच्चू कडू हे त्यापैकीच एक आहेत. त्यामुळे, लहान सहान पक्षांना सोबत घेऊन तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशीही त्यांची चर्चा सुरू असल्याचे समजते. याच दरम्यान, आमदार बच्चू कडू विविध जिल्ह्यात जाऊन आढावा घेत आहेत. आज हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी नाव न घेता आमदार संतोष बांगर (Santosha Bangar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आमदार बांगर यांच्यावर टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.


बच्चू कडू हे अपक्ष आमदार आहेत, पण शिवसेनेला पाठिंबा देत त्यांनीही गुवाहटी गाठलं होतं. त्यामुळे, ते महायुतीत असल्याचं स्पष्ट झालं, मात्र सातत्याने आपली भूमिका स्पष्ट करताना ते सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसून येतात. आजही कमळमनुरी मतदारसंघात भाषण करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. तसेच, आमदार संतोष बांगर यांच्यावरही प्रहार केलाय. ''आपली लढाई गरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांची आहे, 50 माणसं घेऊन जाणाऱ्या एसटीच्या ड्रायव्हरला 12 हजार रुपये महिना मिळतो आणि 1 माणूस घेऊन जातो, त्या कलेक्टरच्या ड्रायव्हरला 45 हजार रुपये महिना भेटते, अरे सालो तुम्हारे बाप का राज है क्या बच्चू कडू अभि जिंदा है,उखाड के फेकना है इन लोगो को,'' असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. 


तुमच्या बापाचं राज्य आहे का, तुमचा संडास पाच लाखांचा अन् आमचं घर सव्वा लाखांचं, लाज नाही वाटत का तुम्हाला, हे कोणी विचारत नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले. तसेच, घेतली कावड की निघाला महादेवाला, अरे महादेव त्रिशुळ घालील की ढुंगणात असे म्हणत बच्चू कडू यांनी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता टीका केलीय, यावेळी टीका करतांना आमदार कडू यांची जीभ घसरल्याचं दिसून आलं.


मुख्यमंत्र्‍यांवरही निशाणा साधला


"दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहात नाही. शेतकरी, शेत मुजरांच्या प्रश्नावर काम करतोय. 15-20 आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करु, उचलून नेऊन टाकू समुद्रात, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजेत", असे अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. ते हिंगोलीमध्ये बोलत होते. 


बच्चू कडूंकडून 25 जागांची चाचपणी


तिसऱ्या आघाडीसाठी बच्चू कडूंनी 25 जागांसाठी चाचपणी केली आहे. सरकारकडे आमच्या 18 मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही. आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी, मनोज जरांगे, MIM सोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावरच एकत्र बसू अन्यथा आम्ही बसणार नाही. वेळ आली तर एकटे लढू. मात्र मुद्द्यांवर ज्या ज्या पक्षाचं एक मत होईल त्यांच्यासोबत आम्ही लढू. आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.