मुंबई : राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना (Ladki bahin yojana) 1500 रुपयांत वाढ करुन 2100 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती. मात्र, राज्यात महायुती (Mahayuti) सरकार येऊन 6 महिने होत आले, त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशनही पार पडलं. मात्र, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच, सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी 2100 रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असे म्हटले. तर, आता मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असे शिरसाट यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळविण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरुन एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. त्यातच, आज भूमिका मांडताना शिरसाट यांनी स्पष्टच शब्दात लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले.
राज्याच बजेट अडीच लाख कोटी रुपयांच आहे. सामाजिक न्याय विभागाला साडे एकोणतीशे कोटी मिळायला हवेत. मला 22 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी 3 हजार कोटी विविध योजनेसाठी 7 हजार कोटी दिले आहेत. मला केवळ 15 हजार कोटी रुपये मिळाले, त्यातील 7 हजार कोटी दुसऱ्या योजनेला गेले आहेत. त्यामुळे, मला 3 हजार कोटी रुपये देणे आहे. मुख्यमंत्र्यांना मी लेखी पत्र दिलं आहे, अजित पवार यांना देखील विनंती केली आहे. 11.8 टक्के रक्कम मला म्हणजेच माझ्या खात्याला देणं गरजेचे आहे, असे म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली.
1500 चे 2100 करता येणार नाही
लाडक्या बहीण बाबत मला फेब्रुवारी मधे फाईल आली होती त्यावेळी मी स्पष्टपणे पैसे देत येणार नाही अस लिहिलं होतं. लाडक्या बहीण योजनेचे सरकारवर बर्डन आहे. अजित पवार जाणीवपूर्वक करत असतील असं मला वाटत नाही. त्यांना गाईड करणारे सेक्रेटरी चुकीच ब्रीफ करत असणार, असे म्हणत संजय शिरसाट यांनी आपली नाराजी आणि लाडकी बहीण योजनेबद्दलची वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली. 1500 रुपयेची रक्कम 2100 करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे ती मान्य करावी लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.
मंत्रिमंडळ बैठकीत सगळे विषय निघणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या महाबळेश्वर महोत्सवास उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. यासंदर्भात शिरसाट यांनी भूमिका मांडली. एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री न जाण असं अनेकवेळा होतं असतं. अनेकवेळ कार्यक्रमाला वेळा दिल्या जातात, मात्र काहीवेळा जाता येत नाही. अजित पवार माझ्या मतदारसंघात आले मात्र मला माहितीच नाही. मला सांगणं अपेक्षित होतं मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. तसेच, उद्या चौंडीला कैबिनेट बैठक होतं आहे या बैठकीमधे सगळे विषय निघणार आहेत. काम करताना फ्रिडम द्यायला हवं. मी माझी व्यथा मांडत आहे, मी पैसा काय घरी घेऊन जात नाही. मला खातं चालवायच आहे, खात चालवताना अडचणी येत आहेत त्या बोलण गरजेचं आहे, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
डॉ. वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट! डॉ. सोनाली वडिलांसह गायब? दोघेही बेपत्ता, परदेशात गेल्याची चर्चा