Sanjay Raut : महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था (मित्र) या आयोगाच्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय अशर (Ajay Asher) यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा निर्णय घेत अजय अशर यांना संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंना राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात असून यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अजय अशरवर निशाणा साधलाय.
याबाबत संजय राऊत म्हणाले की, या उद्योजकांच्या समितीवर प्रवीण परदेशी यांची नेमणूक होणे याचे आम्ही स्वागत करतो. अजय अशय हा ठाण्यातला बिल्डर होता. त्याचे उद्योग सर्वांना माहिती आहे. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणे, जमिनीचे व्यवहार करणारे आणि त्यांच्या पैशाचे संरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेना तीन वर्षांपूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला. आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या पैशांची देवाण-घेवाण करण्यामध्ये अजय अशर होता. अजय अशर, भाजपचे खासदार सुरतचे खासदार आणि मुंबईतले काही ठेकेदार या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. अजय अशरने मधल्या काळात हजारो कोटींची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी देश सोडला आहे. त्याने देशातून पलायन केले आहे. नीरव मोदी, विजय माल्या असे अनेक लोक पाळले आहेत. आता अजय अशर पळाला, असे त्यांनी म्हटले.
त्याचे राजकीय आका ईडीची फिट केस
कोणीतरी राणा नावाचा अतिरेकी आहे. त्याला परत आणण्यासाठी चर्चा सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहेत. त्यांना परत कधी आणणार? अजय अशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे आणि किती पैसा गोळा केला? किमान दहा हजार कोटी रुपये घेऊन हे महाशय परदेशात स्थायिक व्हायला गेले आहेत. त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधील अनेकांनी पैसे गुंतवले आहे. जर देवेंद्रजींनी भूमिका घेतली असेल, अशा व्यक्तीला मित्र या संघटनेतून दूर करावे, आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणावे, तर त्याचे स्वागत केले पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले. अजय अशर आणि त्याचे राजकीय आका ईडीची फिट केस आहे. पण ईडी यांच्याकडे पोहोचणार आहे का? गृहमंत्रालयाने अजय अशरला विविध गुन्हे दाखल करून त्याची झडती घेऊन चौकशी केली पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. ते फक्त उड्या मारायचे. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या. पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो. अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करत नाही.त्यामुळे त्यांचे पंख छाटले जात आहेत हे मला मान्य नाही. त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
आणखी वाचा