Maharashtra Politics : 2024 ला परिवर्तन झाले नाही तर, शेवटची निवडणूक असेल, असं वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. वंचित आणि मविआची युती नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यावर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'आंबेडकर विचारसरणीची जी गावागावातील जनता आहे, त्यांची मानसिकता आहे की, प्रकाश आंबेडकर साहेबांनी या वेळेला हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाविकासआघाडीसोबत यावं, या प्रवाहात सामील व्हावं, ही राज्यभरातील जनतेची भावना आहे.'


2024 ला परिवर्तन झालं नाही तर, शेवटची निवडणूक : राऊत


प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत यांनी म्हटलं की, 'मी त्यांची प्रतिक्रिया ऐकली, त्यांनी अशा सूचना द्यायला नको. आंबेडकर विचारसरणी बघता हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीत आंबेडकर यांनी सामील व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी मविआमध्ये सामील व्हायला हवं. बाळासाहेब आंबेडकर जिथे जातील तिथे संविधानाची भूमिका मांडत आहे, त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. 2024 ला परिवर्तन झाले नाही तर, शेवटची निवडणूक असेल आणि हुकुमशाही सुरू होईल. तीच भूमिका प्रकाश आंबेडकर मांडत आहे. नाशिकमध्ये संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ही भूमिका मांडली आहे.


ही मोदी गॅरंटी, राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा


भाजपने आगामी लोकसभेसाठी कृपा शंकर सिंह यांनी उमेदवारी दिल्यानंतर संजय राऊतांनी यावर टीका केली आहे. राऊतांनी म्हटलं की, 'यातले सूत्र समजून घेतले पाहिजे. अजित पवार, अशोक चव्हाण, कृपाशंकर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती. कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप झाले आणि फडणवीस यांनी क्लीन चिट दिली.' 


मोदी सरकारवर टीका करताना राऊतांनी पुढे म्हटलं आहे की, 'कृपाशंकर यांच्यावर गैरमार्गाने संपत्ती मिळवली असा आरोप होता, नंतर गृहमंत्री असतांना त्यांनीच क्लीन चिट दिली. तुरुंगात न पाठवता तिकीट दिले, ही मोदी गॅरंटी आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट दिली ही मोदी गॅरंटी. अशोक चव्हाण यांना तुरुंगात न टाकता राज्यसभा दिली ही मोदी गॅरंटी. ज्यांना तुरुंगात टाकायचे त्यांना उमेदवारी दिली ही मोदी गॅरंटी.'


'अजित पवारांना तुरुंगात पाठवणार होते'


भविष्यात 195 पैकी 70 लोक हे कृपाशंकर सिंह यांच्या सारखे असतील. दुसऱ्या पक्षातील आहे, भाजपकडे स्वतःचे काही नाही. इतके मोठे नेते आहेत, स्वतःचे काय आहेत भाजपकडे? शिखर बँक घोटाळ्यात चक्की पिसायला अजित पवार यांना तुरुंगात पाठवणार होते. जवळपास चाळीस हजार कोटीचा घोटाळा होता, त्याचं काय झालं, पुरावे कुठे गेले, फडणवीस यांनी गिळले का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केल आहे. आता क्लीन चीट दिली असेल, गुन्हे दाखल झाले होते, तरी कशी क्लीन चिट दिली.'


सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा


सुनेत्रा पवार यांनी फडणवीस यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे. अजित पवार यांची बदनामी केली म्हणून खटला दाखल करावा. अनिल देशमुखांना ब्लॅकमेल करण्यात आले, मी याचा साक्षीदार आहे. गृहमंत्री असताना अफीडेवीट द्यायला सांगत होते. देशमुख यांच्याकडे मोठे पुरावे आहेत. देशमुख यांच्यावर दबाव होता. नेत्याची नावे घ्या असं सांगण्यात आलं होतं. देशमुख झुकले नाही लढले आणि सुटले, असं राऊतांनी म्हटलं आहे.