Sanjay Raut on Devendra Fadnavis : मराठी आलीच पाहिजे, मातृभाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Continues below advertisement

संजय राऊत पुढे म्हणाले की, मराठी भाषासंदर्भात आम्ही हिंसाचार करणार. काय उखडायचे ते उखडून घ्या. हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस. हे राज्य मराठी माणसाचे आहे. 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे. तुम्ही दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात. 

मराठी भाषेसंदर्भात हिंसाचार करणारच

तुमचे मुख्यमंत्रिपद ज्या दिवशी जाईल, तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागाल हे आम्हाला माहिती आहे. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणारच. तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जात आहात का?  मराठीचा आग्रह धरतोय म्हणून आमच्यावर गोळ्या घालणार आहात का? हो धरतोय आणि धरत राहणार. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही. तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा, असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.  

Continues below advertisement

कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांची टीका

कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत म्हणाले की,  50 खोके एकदम ओके या घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल आहेत. विधान भवनाच्या आवारात विधानसभा सुरू असताना काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि ती संपूर्ण देशात पसरली. आता 50 खोके एकदम ओके वाले कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आहेत. 

कैलास गोरंट्याल यांनी काल असे सांगितले की, कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका-एका मतदारसंघात शंभर कोटी रुपये खर्च केले आणि सरकारी पोलिसांच्या वाहनातून पैशाचे वाटप सुरू होते. त्यानंतर आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार? त्यामुळे मला भाजपमध्ये यावे लागले, असे कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे. आज ते देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आले आहे. त्यामुळे खोक्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. राहुल गांधी यांनी मोहीम उभारली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 लोकसभेच्या जागांवर कशाप्रकारे हेराफेरी केली. त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे. किती काळ तुम्ही उद्धव ठाकरेंमध्ये अडकून पडणार आहात. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झालेले आहेत. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.   

आणखी वाचा 

Video : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य