मुंबई : शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पत्रकार परिषद घेऊन आज शिवेसना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरील गंभीर आरोपाची माहिती दिली. आपल्या पत्रकार परिषदेत गोऱ्हे यांनी स्वप्ना पाटकर यांच्याबद्दलची माहिती दिली. त्यामध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, मला न्याया द्या अशी मागणी स्वप्ना पाटकर यांनी केली आहे. स्वप्ना पाटकर ह्या मुंबईतील सांताक्रुज परिसरात राहत असून पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातही त्यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध जबाब दिला होता. तर, खासदार राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी एका महिलेला फोनवरुन धमकीवजा शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलं होतं, ते प्रकरण स्वप्ना पाटकर यांच्याशीच संबंधित असल्याचंही समोर आलं आहे. त्यातच, आज नीलम गोऱ्हे यांनी स्वप्ना पाटकर यांची बाजू मांडताना पत्रकार परिषदेतून संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. तर, थेट उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव घेऊन, याप्रकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं नीलम गोऱ्हेंनी म्हटलं आहे. 


मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांना याबाबत माहिती दिली, तसेच स्वप्ना पाटकर यांचं म्हणणं ऐकून घ्या, असे म्हटले होत. तसेच, संजय राऊत यांनाही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याबाबत बोलले होते. मात्र, त्यावर त्यांनी मलाच प्रश्न केला की, तुम्ही हे प्रकरण घेऊन माझ्याकडे आलातच का, असा गौप्यस्फोही नीलम गोऱ्हेंनी केला आहे. गोऱ्हे यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन हकीकत सांगितली. दरम्यान, या पत्रकार परिषदेतून स्वप्ना पाटकर यांनी मांडलेलं नीलम गोऱ्हेंकडे केलेल्या तक्रारीची प्रतही वाचून दाखवली आहे. तसेच, ह्या तक्रारी मुख्यमंत्री, गृहमंत्री, महिला आयोग आणि माझ्याकडेही त्यांनी दिल्याचं गोऱ्हेंनी सांगितलं आहे.



2013 पासून माझा छळ


''मी स्वप्ना पाटकर, माझ्या वृद्ध आईसोबत कालिना, सांताक्रूझ येथे वरील पत्त्यावर राहते. शांततेत आणि सन्मानाने राहणे हा माझा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून संजय राजाराम राऊत यांच्याकडून होणारा छळ, पाठलाग आणि शिवीगाळ यामुळे मला सामान्य जीवन जगणे कठीण झाले आहे. संजय राऊत यांनी फक्त माझाच छळ केला नाही तर माझे कुटुंब आणि प्रियजनांचाही छळ केला आहे. मी भीतीमध्ये आणि दडपणाच्या दबावाखाली जगत आहे. 2013 पासून मी संजय राऊतच्या छळातून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. मला अद्याप कोणीही न्याय दिला नाही आणि मी अजूनही न्यायासाठी लढत आहे. याबाबत हजारो पत्रे पोलिस विभागाला आणि मला मदत करू शकणाऱ्या लोकांना मी लिहिली आहेत पण तरीही मला त्रास होत आहे. आज पुन्हा पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून माझे लक्षात आले आहे की मी जिथे जाते तिथे माझा पाठलाग केला जातो,'' असे आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे.  


2 मे रोजी बाईकवरुन माझा पाठलग


2 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास मी एक व्यक्ती बाईकवर पाहिली. बीकेसी वन या बिल्डिंगपासून माझा घरापर्यंत माझ्यामागे फिरताना पाहिली. मी घरी पोहोचेपर्यंत बाईक माझ्यामागे होती. हे माझ्यासोबत पूर्वी घडलेल्या सर्व गोष्टींसारखेच आहे. आता मला कोण आणि कशी मदत करेल हे मला माहीत नाही. 2013 मध्ये मुंबईत एका महिन्याच्या कालावधीत माझ्यावर दिवसा 2 वेळा हल्ला झाला जिथे सर्वत्र सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. कोणी सापडले नाही असे सांगून प्रकरणे बाजूला ठेवण्यात आली. माझ्या कोणत्याही प्रकरणात मुंबई पोलिसांना काहीच सापडले नाही हे कसे शक्य आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. (FIR 239/2013 Mahim Poice Station, FIR 324/2013 Vakola Police Station) संजय राऊत यांनी मला फॉलो करण्यासाठी आणि माझा ठावठिकाणा शोधण्यासाठी स्टार सुरक्षा गुप्तहेर नियुक्त केले होते. मी कुठे आणि कोणासोबत आहे हे सांगणारे राऊतचे ईमेल आणि मेसेज मला यायचे. त्याची तक्रार केली होती. पण त्यावर माझी तक्रार नोंदवली गेली नाही, असेही पाटकर यांनी म्हटले आहे. 






दरम्यान, पाटकर यांनी आपल्या ट्विटरवरुन संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळाबाबतचा संपूर्ण घटनाक्रमही पत्राच्यारुपाने शेअर केला आहे. नीलम गोऱ्हेंनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पत्र शेअर केलं आहे.