Sanjay Jadhav on Eknath Shinde, परभणी : चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर बदलापूरमध्ये आंदोलन करत रेल्वे रोको करण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा राजकीय स्टंट असल्याचे म्हटले होते. दरम्यान, शिंदेंनी अशा प्रकार भाष्य केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव चांगलेच संतापले आहेत. "घरातील महिलेवर प्रसंग घडला तर राजकीय स्टंट म्हटलं असता का? " असा सवाल संजय जाधव (Sanjay Jadhav)
यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) केलाय. ते परभणी येथे पत्रकारांशी बोलत होते. 


ब्लॅकमेल करूनही आम्ही तिकडे गेलो नाही म्हणून आमचे वाटोळं करण्याचा त्यांचा हेतू 


संजय जाधव म्हणाले, परभणी शहराच्या बकाल अवस्थेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच कारणीभूत आहेत. जर मुख्यमंत्र्यांच्या घरातील सदस्यांवर असा प्रकार झाला असता तर मुख्यमंत्री हा राजकीय स्टंट आहे, असं म्हणाले असते का ? आम्हाला ब्लॅकमेल करूनही आम्ही तिकडे गेलो नाही म्हणून आमचे वाटोळं करण्याचा त्यांचा हेतू आहे. खासदार संजय जाधव यांनी थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. 


 गृह विभागाच्या जोरावर या सरकारचं हुकूमशाहीचं राज्य चालू 


पुढे बोलताना संजय जाधव म्हणाले, बदलापूरमध्ये एवढी मोठी घटना घडूनही मुख्यमंत्री म्हणतात की हा राजकीय स्टंट आहे. आंदोलनकर्त्यांना तिथं डांबले जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात जर अशी घटना मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील कुणासोबत झाली असती तर हा राजकीय स्टंट आहे? असं मुख्यमंत्री म्हणाले असते का? राज्यांमध्ये सामान्यांचे नाही तर गृह विभागाच्या जोरावर या सरकारचं हुकूमशाहीचं राज्य चालू आहे, असंही संजय जाधव म्हणाले. 


परभणीची बकाल अवस्था करून आमचं वाटोळं करण्याचा त्यांचा हेतू


परभणीत महाविकास आघाडीने उद्या पुकारलेल्या बंद संदर्भात माहिती देण्यासाठी परभणीतील महाविकास आघाडीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना संजय जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधलाय. आम्हाला ब्लॅकमेल करूनही आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. त्यामुळे ना निधी दिला  जातोय ना अधिकारी आमचं ऐकत आहेत. त्यामुळे परभणीची बकाल अवस्था करून आमचं वाटोळं करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे जाधव म्हणाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


Jayant Patil : समरजितसिंहानी मेसेज पाठवला, जयंत पाटील म्हणाले, आम्ही टप्यात आलं की लगेच कार्यक्रम करतो