Sameer Bhujbal : नांदगाव मतदारसंघ (Nandgaon Constituency) भयमुक्त करण्यासाठी मी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली आहे. समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा  दिला आहे. तसेच येत्या 28 तारखेला मी उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


नांदगाव मतदारसंघामध्ये विकास खुंटला 


नांदगाव मतदारसंघामध्ये विकास खुंटला आहे. विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार आल्यानंतर मतदारसंघामध्ये दुरावस्था झाली असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली आहे. नांदगाव मतदारसंघामध्ये अतिशय भयभीत वातावरण असल्याचे समीर भुजबळ म्हणाले. जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यामुळं दुसरा काहीतरी निर्णय घ्यावा असी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळं मी निवडणूक लढवण्याचा निर्णय गेतल्याचे समीर भुजबळ यावेळी म्हणाले.  


नेमकं काय म्हणाले समीर भुजबळ?


साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्त केली होती. ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले. यामध्ये जिल्हाध्यक्ष पासून बुधपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली. मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगाव मध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहे. नांदगाव मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगाव मधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगाव मधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा अशी नम्र विनंती आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे.


नाव न घेता सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका


दरम्यान, यावेळी बोलताना समीर भुजबळ यांनी नाव न घेता सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका केली. नांदगाव मतदारसंघात अनेक विकासाची कामे प्रलंबित आहेत. अनेक भागात पाणी नाही, रस्त्यांची दुरावस्था असल्याचे भुजबळ म्हणाले. माझी आमदार होण्याची इच्छा आहे असं काही नाही. पण नांदगावमध्ये विकासाची कामं दिसत नाहीत. मतदारसंघात भयभीत वातावरण झालं आहे. तसेच निवडणुकीला कोणत्याही परिस्थितीत उभं राहावं अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळं मी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.