Sadabhau Khot on Vidhan Parishad Election, Mumbai : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय. महायुतीकडून 9 उमेदवारांनी अर्ज भरला होता, या सर्वच उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची मतं फुटली नसती तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले नसते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला नसता. जयंत पाटील  (Jayant Patil) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, आता जयंत पाटील यांच्या पराभवानंतर विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)  यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.  शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठित खंजीर खुपसलाय, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. 


सदाभाऊ खोत काय काय म्हणाले? 


सदाभाऊ खोत म्हणाले, महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. ते म्हणतात, महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन मी करु शकतो. कोणाचीही सत्ता आणू शकतो. कोणाचीही सत्ता घालवू शकतो. शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत आलं होतं. तेव्हा शरद पवारांनी फोडाफोडी केली. स्वत:कडे सत्ता येत असेल तर वाटेल ते करण्याची पवारांची तयारी असते. या राज्यातील शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचं काम शरद पवारांनी केलं. मुख्यमंत्री करताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात. भाजपची साथ सोडताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात, मग जयंत पाटलांच्या साध्या उमेदवारीसाठी त्यांनी का ऐकलं नाही. हा पवारांनी टाकलेला डाव होता. या डावामध्ये जयंत पाटलांचा बळी गेला, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. 


प्रस्थापितांचा सिंहासनावर हक्क नाही, तर कष्ट करणाऱ्या जनतेचा सिंहासनावर हक्क 


पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, गावगाड्याच्या चर्चा नेहमी होत असतात, फाटक्या माणसांच्या होतात. वाड्यातील माणसांच्या चर्चा होत नाहीत. कारण ते जन्माला येतानाच ताम्रपट घेऊन आलेले असतात. कोणतीही सिंहासन हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो. परंतु भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, प्रस्थापितांचा सिंहासनावर हक्क नाही, तर कष्ट करणाऱ्या जनतेचा सिंहासनावर हक्क आहे. मला वाटतंय प्रस्थापितांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. त्यांचे वाडे उद्ध्वस्थ झालेत. हे कालच्या निकालावरुन स्पष्ट झालं. 


देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासारख्या फाटक्या माणसाला महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात काम करण्याची संधी दिली


शेतकऱ्यांचे शिवार हिरवेगार होऊ दे. त्याच्या खळ्यावरती धन धान्याची रास लागू दे. धान्याला भाव मिळू दे, अशी मागणी मी बाप्पांच्या चरणी केली. गावगाड्यात राबणाऱ्या माणसाने मला वाढवलं. तळ हातावरिल फोडाप्रमाणे मला जपलं. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासारख्या फाटक्या माणसाला महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात काम करण्याची संधी दिली. देवेंद्रजींना बाप्पाने उदंड आयुष्य द्यावे, असं साकडं सदाभाऊ खोत यांनी घातलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


''उद्धवजी, मग ऐनवेळी असं का केलं?; लोकसभेचा निकाल डोक्यात जाऊ देऊ नका''; पाटलांच्या पराभवाने पाटील संतापले