मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात तापलं असून विरोधकांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. निवडणूक आयोगासह भाजपा सरकारलाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सवाल केले आहेत. तसेच, मुंबईत (Mumbai) 1 नोव्हेंबर रोजी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यावरून, आता ऍड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केलीय.

Continues below advertisement

तुम्हाला सांगतो देशात कायद्याच राज्य आहे, राज,उद्धव, शरद पवार म्हणतात म्हणून गलत काम मुंबईत चालणार नाही. त्यांनी सत्याचा मोर्चा नाही, तर ढोंग्याचा मोर्चा काढण्याचं काम सुरू केलं आहे. हा लबाडांचा मोर्चा आहे, इतरांना जसे कायदे लागू असेल, त्यांना जो नियम तोच नियम राज, उद्धव आणि शरद पवारांच्या मोर्चाला असेल, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी विरोधकांच्या मोर्चाववर टीका केलीय. उच्च न्यायालयाने विरोधकांना मोर्चासाठी आझाद मैदान ठरवून दिले आहे, उच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार दुसरीकडे मोर्चा काढता येणार नाही, असेही सदावर्ते यांनी म्हटलं. शरद पवार कृषीमंत्री होते, मुख्यमंत्री होते त्यांना या वयात हे उलगडू नये?. उद्धव ठाकरेंचा संजूबाबा म्हणाला की बोलून वळवता येत नसते, सुप्रीम कोर्टाची केस तिकडे वळू असे म्हणतो. पण, तुमच्यात निवडणूक लढायची ताकद नाही म्हणून तुम्ही हे करता. शरद पवार, संजूबाबा बोलायचे निवडणुका पाहिजे, आता निवडणुका लागत आहेत.

सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका (Gunratna sadavarte on raj Thackeray)

राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनांव रोक के दिखाव, असे म्हणत राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून देखील सदावर्ते यांनी पलटवार केला आहे. नियमात मोर्चा असेल तर परवानगी द्यावी, अन्यथा नाही. हे दळभद्री उद्या मरणार म्हणून आज गौऱ्या रचत आहेत. जरांगेच्या वेळी न्यायालयाने सांगितले होते की मोर्चा ठरवून दिलेल्या जागीच केले पाहिजे. ते जर जास्त डुर डुर करू लागले तर त्यांच्या मुसक्या आवळा. सुमार दर्जाचा व्यंगचित्रकार उद्धव हा नालायक आहे. त्यामुळे, या मोर्चाला पाठ फिरवा, असेही सदावर्ते यांनी म्हटले. दरम्यान, जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होत नाही, हा घोळ मिटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावरुन, सदावर्ते यांनी खोचक टीका केली आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण