Agnipath Scheme Protest: केंद्रीय गृहमंत्रालयाने बिहारमधील भाजपच्या 12 नेत्यांना CRPF सुरक्षा दिली आहे. या नेत्यांमध्ये प्रदेश भाजप अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल, दोन्ही उपमुख्यमंत्री तार किशोर प्रसाद आणि रेणू देवी, भाजपचे फायर ब्रँड आमदार हरिभूषण ठाकूर, दरभंगाचे भाजप आमदार संजय सरावगी, दिघाचे आमदार संजीव चौरसिया, दरभंगाचे खासदार गोपाल ठाकूर, भाजपचे आमदार अशोक अग्रवाल आणि आमदार दिलीप जैस्वाल यांचा समावेश आहे. सीआरपीएफचे 12 जवान त्यांच्या संरक्षणात असतील. आमदार हरिभूषण ठाकूर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.


अग्निपथ विरुद्धच्या आंदोलनादरम्यान भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष डॉ.संजय जयस्वाल आणि उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी बेतिया येथे संतप्त विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे हल्ला केला, त्यानंतरच केंद्र सरकारने भाजप नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी डॉ.संजय जयस्वाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, बिहारमध्ये अग्निपथ आंदोलनादरम्यान केवळ भाजप नेत्यांनाच लक्ष्य केले जात असून त्यांच्या निवासस्थानावर हल्ले केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आतापर्यंत 138 एफआयआर आणि 718 जणांना अटक


बिहारमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. बिहारमध्ये हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर आतापर्यंत 138 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच 718 जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था संजय सिंह म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ फुटेजच्या आधारे हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे.


15 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद


अग्निपथच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने 15 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली आहे. बिहारमधील 15 जिल्ह्यांमध्ये 19 जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Agneepath Scheme वरुन मोदी सरकार पॅनिक मोडमध्ये? तीन दिवसांत तीन मोठ्या घोषणा करुन असंतोषाची आग विझवण्याचा प्रयत्न
Agneepath Scheme : अमेरिका, चीन आणि इतर देशात अग्निवीरांची निवड कशी होते?